१५७ कोटींचा घोटाळा; आज होणार सुनावणी
By Admin | Updated: September 8, 2015 00:36 IST2015-09-08T00:36:26+5:302015-09-08T00:36:55+5:30
सर्वांचे लक्ष : सर्वच पक्षांचे दिग्गज राजकारणी अडकले

१५७ कोटींचा घोटाळा; आज होणार सुनावणी
सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेतील १५७ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी चौकशी अधिकारी संपतराव गुंजाळ यांनी सात विद्यमान संचालक, ३६ माजी संचालक, ५० वारसदार आणि ७ अधिकारी अशा शंभरजणांवर आरोपपत्र दाखल केले आहे. मंगळवारी ८ सप्टेंबर रोजी यासंदर्भात सुनावणी होणार आहे. त्यामुळे आरोपपत्र दाखल झालेल्या लोकांपैकी कितीजण म्हणणे मांडणार आणि त्यावर चौकशी अधिकारी काय निर्णय देणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.या मोठ्या आर्थिक घोटाळ््यात जिल्ह्यातील सर्वच पक्षाचे दिग्गज नेते अडकले आहेत. चौकशी अधिकारी गुंजाळ यांनी ९६ पानी आरोपपत्र आणि १८ पानी नोटीस तयार केली आहे. ८ सप्टेंबर रोजी लेखी अथवा तोंडी म्हणणे पुराव्यासह सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्वच राजकारण्यांची म्हणणे मांडण्यासाठी सध्या धावपळ सुरू आहे. म्हणणे मांडण्यासाठी एकच मुदत असल्यामुळे यात अडकलेल्या लोकांची चिंता वाढली आहे. तीन वर्षापूर्वी जिल्हा बँक आर्थिक अडचणीत आल्यानंतर रिझर्व्ह बँकेने प्रशासकाची नियुक्ती केली होती. बँकेच्या संचालक मंडळाच्या कालावधित नियमबाह्य कर्जवाटपाची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमातील कलम ८३ नुसार चौकशी करण्यात आली होती. या चौकशीत २१ संस्थांना नियमबाह्य कर्जवाटप करून १५० कोटी व १७ संस्थांना एकरकमी कर्ज परतफेड योजनेतून ७ कोटी ९ लाखांचे नुकसान झाल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.
या नुकसानीची जबाबदारी निश्चित करण्यासाठी सुनावणी झाली होती. या सुनावणीला माजी संचालकांनी आक्षेप घेत सहकारमंत्र्यांसमोर अपील केले होते. तत्कालीन सहकारमंत्र्यांसमोर चारवेळा सुनावणी होऊनही त्यांनी निर्णय घेतला नाही. त्यामुळे माजी संचालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने सहकारमंत्र्यांकडील अपिलावर तातडीने निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जानेवारी २०१५ मध्ये याविषयीची सुनावणी घेऊन, कलम ८८ च्या चौकशीचा मार्ग खुला करण्यात आला. आता याच कलमान्वये सुनावणीची प्रक्रिया पूर्ण झाल्याने आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. (प्रतिनिधी)
अडकलेले संचालक...
आ. अनिल बाबर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, काँग्रेसचे महेंद्र लाड, बी. के. पाटील, प्रा. सिकंदर जमादार.