शेट्टींसह १४५ आंदोलकांना अटक
By Admin | Updated: January 13, 2015 06:24 IST2015-01-13T06:24:30+5:302015-01-13T06:24:30+5:30
ऊसाला किमान वाजवी किंमत (एफआरपी) न देणाऱ्या साखर कारखानदारांवर कारवाई करा, या मागणीसाठी आंदोलन करणा-या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी साखर आयुक्तांच्या कार्यालयाची तोडफोड केली.

शेट्टींसह १४५ आंदोलकांना अटक
पुणे : ऊसाला किमान वाजवी किंमत (एफआरपी) न देणाऱ्या साखर कारखानदारांवर कारवाई करा, या मागणीसाठी आंदोलन करणा-या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी साखर आयुक्तांच्या कार्यालयाची (साखर संकुल) तोडफोड केली. या प्रकरणी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी आणि प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्यासह १४५ आंदोलकांवर गुन्हे दाखल केले असून त्यांना अटक करण्यात आली आहे. रात्री उशिरा राजू शेट्टी,
सदाभाऊ खोत यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांची अतिरिक्त न्यायदंडाधिकाऱ्यांनी जामिनावर सुटका केली.
ऊसदराबाबत चर्चा करण्यासाठी साखर आयुक्त डॉ. बिपीन शर्मा यांनी खा.शेट्टी यांना सोमवारी दुपारी भेटीची वेळ दिली होती. त्यानुसार शेट्टी आले. त्यांच्यासोबत शेकडो शेतकरी होते. या आंदोलनाची पूर्वकल्पना असल्याने पोलिसांनी आधीच बंदोबस्त ठेवला होता.
शेट्टी यांनी शेतकऱ्यांसह आयुक्तांना भेटण्याची इच्छा व्यक्त केल्यावर पोलिसांनी सुरक्षेचे कारण देत त्याला नकार दिला. त्यामुळे शेट्टी आणि खोत यांनी आंदोलकांसह तिथेच ठिय्या दिला.
दुपारी दीड वाजेपर्यंत आंदोलन शांततेत सुरू होते. नंतर एकाएकी काही संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी पोलिसांचे कडे भेदून संकुलाच्या मुख्य इमारतीत प्रवेश केला आणि तळमजल्यावरील कार्यालयाची तोडफोड केली.
पोलिसांनी आंदोलकांवर दंगल आणि शासकीय मालमत्तेचे नुकसान आदी कलमान्वये गुन्हे दाखल केले. खा. शेट्टी यांच्यासह सर्वांना न्यायालयासमोर हजर केले, मात्र त्यांनी जामीन घेण्यास नकार
दिल्यामुळे त्यांना अटक करून स्वारगेटजवळील गणेश कला-क्रीडा मंडळाच्या सभागृहात ठेवण्यात आले आहे. मात्र रात्री उशिरा राजू शेट्टींसह त्यांच्या १४२ सहकाऱ्यांना अतिरिक्त न्यायदंडाधिकाऱ्यांनी जामिनावर सोडले. (प्रतिनिधी)