गडचिरोलीतील १३२ गावांत सौरदिवे मालवले !
By Admin | Updated: June 20, 2015 00:18 IST2015-06-20T00:18:20+5:302015-06-20T00:18:20+5:30
वनकायद्यामुळे नक्षलग्रस्त, दुर्गम व अतिदुर्गम भागात महावितरणला वीजपुरवठा करणे शक्य नव्हते. अशा ठिकाणी महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट

गडचिरोलीतील १३२ गावांत सौरदिवे मालवले !
गडचिरोली : वनकायद्यामुळे नक्षलग्रस्त, दुर्गम व अतिदुर्गम भागात महावितरणला वीजपुरवठा करणे शक्य नव्हते. अशा ठिकाणी महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी (मेडा)मार्फत जिल्ह्यात सौरऊर्जेच्या विद्युतीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. २०११ ते २०१४ या कालावधीत हे काम करण्यात आले. मात्र या दिव्यांची योग्य ती देखभाल ठेवण्यात न आल्याने ते नादुरुस्तावस्थेत आहेत़ परिणामी १३२ गावांतील सौरदिवे मालवले आहेत़
जिल्ह्यात १६६८ महसुली गावे आहेत. यापैकी २६८ गावांत २०११ पर्यंत वीज पोहोचलेली नव्हती. ही बाब आर. आर. पाटील पालकमंत्री झाल्यानंतर त्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी पहिल्याच आढावा बैठकीत जानेवारी २०१० मध्ये याबाबत नाराजी नोंदविली व गावांना प्रकाशमान करण्याचा कार्यक्रम हाती घ्या, अशा सूचना केल्या. त्यानंतर महावितरणने १३६ गावांची विद्युतीकरणासाठी निवड केली. तर १३२ गावे त्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने या दुर्गम व अतिदुर्गम गावात सौरऊर्जेचा कार्यक्रम राबवून येथे विद्युतीकरण करण्याचे निश्चित करण्यात आले. या गावांची निवड करण्यासाठी मेडाने ग्रामसेवक, तलाठी, सरपंच, पोलीस पाटील व विविध शासकीय यंत्रणेकडून सर्वेक्षण केले होते. त्यानंतर ही गावे निश्चित करण्यात आली. या गावातील कुटुंबांची संख्या निश्चित करून प्रत्येक घरात सौरऊर्जेची दोन साधने वितरित केली. यामध्ये ३७ वॅटची बॅटरी व दोन सीएफएल लाईट देण्यात आले होते. या १३२ गावांत सौरऊर्जेच्या विद्युतीकरणाचा कार्यक्रम मेडामार्फत पूर्ण झाला, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
दरम्यान, राज्याच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने पर्यावरण समृद्ध ग्राम योजना, मागास क्षेत्र अनुदान विकास योजना आदी योजनांमधून गावात १० घरांमागे एक सौरऊर्जेचा पथदिवा देण्याची योजना सुरू केली. त्यामुळे मेडाने पथदिवे लावले नाही. मात्र, ज्या कुटुंबांना मागील तीन ते चार वर्षांत सौरऊर्जेची साधने वितरित करण्यात आली़ ती नादुरुस्त अवस्थेत आहेत.
अनेक गावांत सौरऊर्जेच्या पथदिव्यांची बॅटरी व सौरऊर्जेची प्लेट चोरीला गेलेली आहे. त्यामुळे हे पथदिवे शोभेची वस्तू बनले आहेत़ एकूणच सौरऊर्जेच्या माध्यमातून विद्युतीकरणाचा प्रयत्न गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्याच्या गावांमध्ये फसला, असे चित्र आहे. (प्रतिनिधी)
कुरखेडा तालुक्यात शासनाच्या विविध योजनांतून लावण्यात आलेले सौरऊर्जेचे पथदिवे बंद पडले आहेत. त्यांची देखभाल व दुरुस्ती करण्यात आली नाही. केवळ दिवे लावून देण्यात आले. त्यामुळे आता अनेक गावांत अंधार आहे. याबाबत जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रशासनाकडे तक्रार देण्यात आली आहे.
- चांगदेव फाये, पं. स. सदस्य, कुरखेडा