मेडिकलमध्ये रोज १३ रुग्णांचा मृत्यू
By Admin | Updated: June 23, 2014 01:22 IST2014-06-23T01:22:05+5:302014-06-23T01:22:05+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) मागील १५ महिन्यांत ८५ हजार ७७७ रुग्णांना भरती करण्यात आले. यातील ५ हजार ९५२ रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसाकाठी सरासरी १३ रुग्णांचा मृत्यू होत

मेडिकलमध्ये रोज १३ रुग्णांचा मृत्यू
१५ महिन्यांत ५,९५२ रुग्णांचा मृत्यू
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) मागील १५ महिन्यांत ८५ हजार ७७७ रुग्णांना भरती करण्यात आले. यातील ५ हजार ९५२ रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसाकाठी सरासरी १३ रुग्णांचा मृत्यू होत असल्याचे या आकडेवारीवरून समोर आले आहे.
मध्य भारतातील सर्वात मोठे रु ग्णालय म्हणून मेडिकलचे स्थान आहे. या रुग्णालयात नागपूर, विदर्भ, महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आदी राज्यांसह मध्य भारतातूनही हजारोंच्या संख्येने रु ग्ण उपचारासाठी येतात. मेडिकलमध्ये अत्याधुनिक सुविधांसह तज्ज्ञ डॉक्टरांचा भरणा असल्याने, रु ग्णालयात दारिद्र्य रेषेखालील, गरीब व श्रीमंत रु ग्णही मोठ्या प्रमाणात येतात. या रु ग्णांमध्ये वेगवेगळ्या सौम्य व जटील आजाराचे रु ग्ण असतात. तसेच विविध अपघातांमधील सामान्य व गंभीररीत्या जखमी रु ग्णांचे मेडिकलमध्ये प्रमाण जास्त असते. याशिवाय खून, गंभीररीत्या जखमी होणाऱ्या रुग्णांचेही प्रमाण अधिक असते. विशेष म्हणजे, शहरात खासगी इस्पितळांची संख्या वाढली असतानाही मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागात रुग्णांची संख्या कमी झालेली नाही. जानेवारी २०१३ ते मार्च २०१४ या १५ महिन्यांत ७ लाख २१ हजार ५४३ रुग्णांनी उपचार घेतला. याच कालावधीत आंतररुग्णांची संख्या ८५ हजार ७७७ रुग्ण एवढी आहे. ही संख्या जवळपास स्थिर असली तरी मृत्यूचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. जानेवारी २०१३ मध्ये ३५० रुग्णांचा मृत्यू झाला, तर मार्च २०१४ मध्ये ३७५ रुग्णांचा मृत्यू झाला. या १५ महिन्याच्या कालावधीत एकूण ५ हजार ९५२ रुग्णांचा मृत्यू झाला. माहिती अधिकारी कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी टाकलेल्या माहितीच्या अधिकारात ही सत्य स्थिती उजेडात आली आहे. मेडिकलमध्ये वाढत्या मृत्यूबाबत एका वरिष्ठ डॉक्टरने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, खासगी रुग्णालयात एखादा रुग्ण गंभीर झाल्यास किंवा औषधोपचारासाठी त्याच्याकडील पैसे संपल्यास अशा रुग्णांना थेट मेडिकलमध्ये पाठविले जाते. यात गंभीर रुग्णांची संख्या सर्वाधिक असते. मागील दोन-तीन वर्षांत याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे दिवसाला सरासरी १३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद होत आहे.(प्रतिनिधिी)