२६ दिवसांत १२ जणांचा मृत्यू

By Admin | Updated: January 28, 2015 01:03 IST2015-01-28T01:03:31+5:302015-01-28T01:03:31+5:30

मागील २६ दिवसांत नागपूर जिल्ह्यात स्वाईन फ्लूने १२ जणांचा मृत्यू झाला. यात २९ जण पॉझिटिव्ह आले असून असून सध्याच्या स्थितीत खासगी इस्पितळात आठ तर शासकीय रुग्णालयात पाच

12 deaths in 26 days | २६ दिवसांत १२ जणांचा मृत्यू

२६ दिवसांत १२ जणांचा मृत्यू

स्वाईन फ्लू वाढतोय : २९ पॉझिटिव्ह; शासकीयसह खासगीमध्ये १५ भरती
नागपूर : मागील २६ दिवसांत नागपूर जिल्ह्यात स्वाईन फ्लूने १२ जणांचा मृत्यू झाला. यात २९ जण पॉझिटिव्ह आले असून असून सध्याच्या स्थितीत खासगी इस्पितळात आठ तर शासकीय रुग्णालयात पाच रुग्ण उपचार घेत आहेत. निदान होण्यास उशीर होत असल्याने रुग्णसंख्या वाढत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
स्वाईन फ्लूचे वाढते रुग्ण व मृत्यूची संख्या पाहता महापौर प्रवीण दटके यांनी आज मंगळवारी तातडीने याविषयी बैठक घेतली. बैठकीत स्वाईन फ्लूविषयी जनजागृतीवर भर देण्याचा निर्णय घेण्यात आला. लोकांना स्वाईन फ्लू म्हणजे काय, त्यावरील उपचार आणि घ्यावयाची काळजी आदी उपाययोजनांची माहिती देण्यात येणार आहे. उपराजधानीत २००९ पासून स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून येऊ लागले. मागील सहा वर्षांत या आजाराने १४२ रुग्णांचा बळी घेतला. २०११ सोडल्यास प्रत्येक वर्षी दहाच्यावर मृत्यूची नोंद आहे. २००९ मध्ये ४५, २०१० मध्ये ५४, २०१२ मध्ये १५, २०१३ व २०१४ मध्ये १०-१० तर या वर्षात आतापर्यंत ११ जणांच्या मृत्यूची नोंद आहे. विशेष म्हणजे, पॉझिटिव्हची संख्या वाढत असल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. शहरात आतापर्यंत १७ रुग्णांना हा आजार असल्याचे निष्पन्न झाले आहे. यातील तीन रुग्ण उपचार घेत असून चार जणांना उपचारानंतर सुटी देण्यात आली. तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर जिल्ह्यात सहा जणांचा मृत्यू झाला असून १२ जण पॉझिटिव्ह आले आहेत. (प्रतिनिधी)
जनजागृतीवर भर देणार
महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सविता मेश्राम यांनी सांगितले की, महापौरांनी आज स्वाईन फ्लूवर बैठक घेतली. यात सर्दी, खोकला आणि ताप असलेल्यांनी तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्वरित तपासणी करण्याची आणि गरज वाटल्यास स्वाईन फ्लूची तपासणी करण्याच्या जनजागृतीवर भर देण्यात येणार आहे. यामुळे लवकर निदान होऊन मृत्यू रोखणे शक्य होईल.
व्हॅक्सिन देणे बंद
शहरातील वोक्हार्ट, क्रिम्स, केअर, होप आणि चांडक या खासगी इस्पितळांमध्ये स्वाईन फ्लूच्या रुग्णांवर उपचार होतो. येथे प्रत्येकी पाच खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. येथील रुग्णांना महापालिकेकडून नि:शुल्क टॅमीफ्लूच्या गोळ्या देण्यात येतात. परंतु खबरदारी म्हणून संबंधित इस्पितळातील डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना व्हॅक्सीन देणे बंद आहे. २०११ पासून आरोग्य विभागाने हे व्हॅक्सीन उपलब्ध करून दिले नसल्याचे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
सुदृढ लोकांनाही स्वाईन फ्लू!
शहरातील काही तज्ज्ञांच्या मते, पूर्वी ज्या रुग्णांमध्ये रोग प्रतिकार शक्ती कमी असयाची, उदा. लहान मुले, गर्भवती महिला व वृद्ध यांना स्वाईन फ्लू होण्याचा धोका अधिक असायचा. असे रुग्णही मोठ्या संख्येत दिसून आलेत. परंतु आता जे रुग्ण येत आहेत त्यांच्यामध्ये रोग प्रतिकार शक्ती चांगली असतानाही हा आजार आढळून येत आहे. विशेषत: ४० ते ५० वयोगटातील सुदृढ महिलांना अचानक आलेला ताप, सर्दी आणि घसा खवखवायला लागल्यानंतर त्यांची चाचणी केली असता स्वाईन फ्लू असल्याचे निष्पन्न आले. परंतु हे काहीच रुग्णांच्या संदर्भात आहे. यावर आणखी संशोधन होणे आवश्यक आहे.
मेडिकलमध्ये पाच पॉझिटीव्ह
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) स्वाईन फ्लूचे १३ रुग्ण भरती आहेत. तब्बल तीन दिवसांच्या सुटीनंतर आज यांच्या नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला. यात पाच रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

Web Title: 12 deaths in 26 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.