पाणी वळवावळवीचा 100 वर्षांचा इतिहास
By Admin | Updated: September 19, 2015 21:32 IST2015-09-19T21:32:16+5:302015-09-19T21:32:16+5:30
ममहाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती आणि वाढत्या नागरीकरणातून शहरी भागाची पाण्याची गरज असा नवा संघर्ष उभा राहण्याची दाट शक्यता नजीकच्या काळात आहे.

पाणी वळवावळवीचा 100 वर्षांचा इतिहास
- वसंत भोसले (लेखक लोकमतच्या कोल्हापूर आवृत्तीचे संपादक आहेत.)
महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती आणि वाढत्या नागरीकरणातून शहरी भागाची पाण्याची गरज असा नवा संघर्ष उभा राहण्याची दाट शक्यता नजीकच्या काळात आहे. कृष्णा किंवा गोदावरी खोऱ्यातील किंवा कावेरीचा पाणी तंटा आदी वादाने आंतरराज्य प्रश्न खूपच गाजले आहेत. आता ते खालपर्यंत येऊ पाहत आहेत. पूर्व वाहिन्या नद्यांच्या खोऱ्यातील पाणी पश्चिमेकडे वळविण्यात आले. त्याला आता १०० वर्षे होऊन गेली. १९११पासून त्याची सुरुवात झाली आणि आता पश्चिमेकडे वळविलेले पाणी मुंबई परिसरातील महानगरांच्या पिण्याच्या पाण्याची तहान भागविण्यासाठी वळविता येईल का? याचा विचार चालू झाला आहे.
सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर उगम पावणाऱ्या नद्यांचे पाणी अडवून कोकणाच्या तळाशी बसविण्यात आलेल्या वीज उत्पादन केंद्रातून वीज तयार करायची अशी पहिली योजना १९११मध्ये सुरू झाली. टाटा पॉवरने हा यशस्वी प्रयोग केला. तत्पूर्वी, कोयनेचे सर्वेक्षण करण्यात आले होते, पण कोयनेच्या खोऱ्याचा विस्तार मोठा आणि प्रचंड पाणी असल्याने आर्थिक भार पेलवणे शक्य नव्हते. त्यामुळे टाटा पॉवरने पुणे जिल्ह्यातील मुळशी आणि लोणावळ्याजवळ इंद्रायणी नदीवर धरणे बांधली. त्याचे पाणी पूर्व वाहिनी होते. ते पश्चिमेकडे वळवून अनुक्रमे भिरा आणि खोपोली (जि. रायगड) येथे वीजनिर्मिती केंद्रे उभारली.
स्वातंत्र्योत्तर काळात कोयनेवर ९८ टीएमसीचे धरण बांधण्यात आले. त्यापैकी ६७.५ टीएमसी पाणी पश्चिमेकडे कोयनेत वळविण्यात आले. त्यातून आता २००० मेगावॅट विजेचे उत्पादन केले जात आहे. या धरणाची साठवण क्षमता वाढवून १०८ टीएमसी पाणी अडविले जाते. त्यापैकी ७५ टीएमसी पाणी पश्चिमेकडे विजेसाठी वळविले जाते. कोयना, मुळशी व खोपोली असे सुमारे १२५ टीएमसी पाणी वापरून खाली सोडण्यात येते.
एका बाजूने वाहणारे पाणी दुसरीकडे वळविण्याचे हे मोठे प्रयोग झाले आहेत. त्यापैकी कोयनेचे पाणी वाया जात आहे आणि पूर्वेकडील पश्चिम महाराष्ट्र तसेच मराठवाडा आणि कर्नाटकचा मोठा प्रदेश कायमस्वरूपी अवर्षणाच्या खाईत आहे. आता विजेची मागणी पूर्ण करायची की, शेती, पिण्याचे तसेच इतर उपयोगाचे पाणी म्हणून हे पूर्ववत पूर्वेकडे सोडायचे हा चर्चेचा विषय होऊ शकतो. मुंबईला पाण्याची वाढती मागणी आहे. ती मागणी पूर्ण करावीच लागेल, पण पाणी वळवून द्यायचे का, हा सवाल उपस्थित होतो.
कोयनेचे पाणी मुंबईकडे वळविण्यास हरकत नाही, पण कोयनेच्या विजेचा ताण कमी केला तर मुंबईकडे पाणी वळवूनही पूर्वेकडील दुष्काळग्रस्त भागाला अधिक देता येईल, असे दुहेरी नियोजन करण्याची गरज आहे. पाणी वळवावळणीच्या इतिहासावरून काही शिकण्यासारखे आहे, अन्यथा पाण्यासाठी मोठे संघर्ष उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- भिरा आणि खोपोली (जि. रायगड) येथे वीजनिर्मिती केंद्रे उभारली. त्यातून सुमारे ४०० मेगावॅट विजेचे उत्पादन होत आहे.
- २००० मेगावॅट विजेचे उत्पादन सध्या कोयनेच्या धरणात केले जात आहे.
- केंद्र सरकारने कोयनेचे पाणी मुंबईकडे वळविण्याच्या प्रस्तावास नुकतीच तत्त्वत: मान्यता दिली आहे. तो प्रकल्प पूर्ण झाल्यास कोयनेचे पाणी कायमस्वरूपी पश्चिमेकडेच द्यावे लागेल. मात्र, पूर्वेकडील वाढती गरजही दुर्लक्षून चालणार नाही. कोयनेचे पाणी मुंबईकडे वळविण्यास हरकत नाही, पण कोयनेच्या विजेचा ताण कमी केला तर मुंबईकडे पाणी वळवूनही पूर्वेकडील दुष्काळग्रस्त भागाला अधिक देता येईल, असे नियोजन हवे.
- पाण्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी पाणी वळविण्याचे प्रकल्प हिताचे नाहीत, पाण्याची उपलब्धता पाहून विकासाचे नियोजन व्हायला हवे.
- एका बाजूने वाहणारे पाणी दुसरीकडे वळविण्याचे हे मोठे प्रयोग झाले आहेत. त्यापैकी कोयनेचे पाणी वाया जात आहे आणि पूर्वेकडील पश्चिम महाराष्ट्र तसेच मराठवाडा आणि कर्नाटकचा मोठा प्रदेश कायमस्वरूपी अवर्षणाच्या खाईत आहे.