दोन एकरात ४४ क्विंटल हरभऱ्याचे उत्पादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:17 IST2021-04-05T04:17:36+5:302021-04-05T04:17:36+5:30
शेतीत योग्य मशागत, बियाणांची निवड, वेळोवेळी खत व फवारणी केली की उत्पादन हमखास निघतेच. त्याला निसर्गाची योग्य साथ मिळाली ...

दोन एकरात ४४ क्विंटल हरभऱ्याचे उत्पादन
शेतीत योग्य मशागत, बियाणांची निवड, वेळोवेळी खत व फवारणी केली की उत्पादन हमखास निघतेच. त्याला निसर्गाची योग्य साथ मिळाली की, मग तर सोने पे सुहागा. असेच काही घडले तिवटघाळचे शेतकरी शिवाजीराव पाटील यांच्या बाबतीत. रबी हंगामात त्यांनी तब्बल १८ एकर क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी केली. यासाठी त्यांनी राहुरी विद्यापीठाचे फुले विक्रम हे बियाणे वापरले. क्षेत्र वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने सर्वत्र समान मेहनत करणे शक्य झाले नाही. ९ एकरात पाणी कमी पडल्याने त्या क्षेत्रावर ५५ क्विंटल उत्पादन निघाले. दुसरीकडे असलेल्या ७ एकरात ७५ क्विंटल हरभरा निघाला आहे. दोन एकरात आंब्याची झाडे लावण्यात आली आहेत. त्यात आंतरपीक म्हणून हरभरा पेरण्यात आला. याच दोन एकर क्षेत्रावर तब्बल ४४ क्विंटल हरभरा निघाल्याचे शेतकरी शिवाजीराव पाटील यांनी सांगितले.
तीन ते चार फुट काळी जमीन...
तिवघाळ शिवारात दोन ते चार फुट जमीन काळी आहे. दोन एकरात आंब्याची झाडे असल्याने स्प्रिंकलरने एकदा पाणी देता आले नाही. त्यामुळे भुईपाटाने दोनवेळा पाणी दिले. पेरणीनंतर ४५ दिवसांनी पहिले पाणी दिले अन् दुसरे पाणी ७२ दिवसांनी दिले. जवळपास अडीच ते तीन फुट उंचीची झाडे होती. रास केल्यावर दोन एकरात ६४ कट्टे हरभरा निघाला. त्याचे वजन घेतले असता तब्बल ४४ क्विंटल उत्पादन झाल्याचे शेतकरी शिवाजीराव पाटील यांनी सांगितले.
मशागतीचे नियोजन महत्वाचे- डॉ.नंदकुमार कुटे
राहुरी विद्यापीठाने २०१७ मध्ये हे फुले विक्रम हे बियाणे विकसित केले. हवामानातील बदल, कमी अधिक पाण्याला हे वाण अतिशय चांगले आहे. तिवटघाळचे शेतकरी शिवाजी पाटील यांनी दोन एकरात घेतलेले उत्पादन उच्चांकी आहे. त्यासाठी त्यांची मेहनत, मशागत महत्वाची ठरली. त्यांना ४४ क्विंटल उत्पादन निघाले. या वाणाचे हेक्टरी ६० क्विंटलपर्यंत उत्पादन निघू शकते, असा दावा राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कडधान्य सुधार प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. नंदकुमार कुंटे यांनी सांगितले.