२८ टक्के बालकांमध्ये जंतदोष; जिल्ह्यात दोन टप्प्यात गोळ्या वाटपासाठी मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:24 IST2021-09-12T04:24:21+5:302021-09-12T04:24:21+5:30

कृमीदोषामुळे ५ ते १९ वयोगातील मुला-मुलींना रक्ताक्षय, कुपोषणासारख्या गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. दीर्घकालीन कृमीदोषामुळे मुलांमध्ये कमजोरी तर येतेच ...

Worm defects in 28% of children; Campaign for distribution of pills in two phases in the district | २८ टक्के बालकांमध्ये जंतदोष; जिल्ह्यात दोन टप्प्यात गोळ्या वाटपासाठी मोहीम

२८ टक्के बालकांमध्ये जंतदोष; जिल्ह्यात दोन टप्प्यात गोळ्या वाटपासाठी मोहीम

कृमीदोषामुळे ५ ते १९ वयोगातील मुला-मुलींना रक्ताक्षय, कुपोषणासारख्या गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. दीर्घकालीन कृमीदोषामुळे मुलांमध्ये कमजोरी तर येतेच शिवाय बालकांची बौद्धिक व शारीरिक वाढही खुंटते. त्यामुळे कृमीदोषाकडे वेळीच लक्ष न दिल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. कृमीदोष आढळणारी मुले ही कायम अशक्त आणि थकलेली असतात व ते अभ्यासाकडे लक्ष देऊ शकत नाहीत. म्हणूनच १ ते १९ वयोगटातील मुलाला जंतनाशक गोळी वर्षातून किमान एक दिलीच पाहिजे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

वयाच्या १९ वर्षांपर्यंत द्याव्या लागतात गोळ्या...

१ ते १९ वर्षे वयाच्या मुलांना जंताचा त्रास जास्त होऊ शकतो. आतड्यांमधल्या जंतांचे पूर्णपणे निर्मूलन करण्यासाठीच वर्षाला जंतनाशक गोळ्यांचे मुलांना वाटप केले जाते. एकदा का जंतांनी शरीरात प्रवेश केला की ते आतड्यात प्रवेश करतात. ते आतड्यातले थर नष्ट करतात. त्यामुळे शरीरात अन्नघटकांचे शोषण नीट होत नाही. म्हणूनच १९ वर्षांपर्यंत जंतनाशक गोळ्या घेण्याची गरज आहे, असे डॉक्टरांचे मत आहे.

जिल्ह्यात जंतनाशक गोळ्या वितरित करण्यासाठी विशेष मोहीम राबविली जाते. पहिला टप्पा पूर्ण झाला असून, दुसरा टप्पा लवकरच राबविला जाणार आहे. १ ते १९ वयोगटातील एकही बालक यापासून वंचित राहू नये, त्यादृष्टीने आम्ही पूर्ण नियोजन केले आहे. -डॉ. गंगाधर परगे, जिल्हा आरोग्य अधिकारी.

काय आहे जंतदोष?

मोठे जंत (गोल जंत), लहान जंत (कृमी) हे लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात असतात. अशी मुले अशक्त असतात. ही मुले लवकर दमतात. त्यांच्या शरीराची वाढ खुंटू शकते. मूल अशक्त असेल, पोट मोठे असेल, ते लवकर दमत असेल, त्याच्या शरीराची वाढ योग्य तऱ्हेने होत नसेल तर जंत झाल्याचे ओळखावे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

आरोग्य विभागातर्फे केले जाते वाटप...

जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे विशेषत: अंगणवाडी ते दहावीपर्यंतच्या मुलांना शाळेतच जंतनाशक गोळ्यांचे वाटप केले जाते. आरोग्यसेविका, आशा आणि अंगणवाडी सेविकांच्या मदतीनेही गोळ्यांचे वाटप होते. जिल्हा परिषदेबरोबरच सर्व शासकीय रुग्णालयातही जंतनाशक गोळ्यांचे वाटप होते.

गोळ्यांसाठी कोणाकडे संपर्क साधायचा?

प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र आणि ग्रामीण रुग्णालयांतही जंतनाशक गोळ्या उपलब्ध होत आहेत. याठिकाणी नागरिक जाऊन गोळ्या घेऊ शकतात, तसेच आरोग्यसेविका, आशा, गटप्रवर्तक यांच्याशी संपर्क साधला तरीही त्या जंतनाशक गोळ्यांची उपलब्धता करून देऊ शकतात.

Web Title: Worm defects in 28% of children; Campaign for distribution of pills in two phases in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.