पोषक वातावरणामुळे गव्हाचे पीक बहरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:14 IST2020-12-07T04:14:01+5:302020-12-07T04:14:01+5:30
ओमप्रकाश तांबोळकर येरोळ : सध्या थंडीचा ज्वर वाढला असल्याने गहू, हरभरा पिकांना पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे येरोळ ...

पोषक वातावरणामुळे गव्हाचे पीक बहरले
ओमप्रकाश तांबोळकर
येरोळ : सध्या थंडीचा ज्वर वाढला असल्याने गहू, हरभरा पिकांना पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे येरोळ व परिसरातील पिके बहरली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील येरोळ व परिसरात यंदा परतीच्या पावसामुळे खरिपाचे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले होते. दरम्यान, या पावसामुळे या भागातील विहिरी, तलाव, नाले तुडुंब भरले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आर्थिक जुळवाजुळव करून रबीचा पेरा केला आहे. पाणी पातळीत वाढ झाल्याने सिंचनाचा आधार असलेल्या शेतकऱ्यांनी गव्हाच्या पेरणीस प्राधान्य दिले आणि पेरणी केली. सध्या मुबलक पाणी व पोषक वातावरणामुळे गव्हाचे पीक चांगले बहरत असल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.
लघू प्रकल्पांचा आधार...
परतीच्या जोरदार पावसामुळे पांढरवाडी लघू प्रकल्पात मुबलक पाणी साठा झाला आहे. तलावातील पाणी सिंचनासाठी उपलब्ध असल्याने गहू, हरभरा या पिकांना आधार मिळाला आहे. सध्या शेतकरी पिकांना पाणी देत असल्याचे दिसून येत आहे.