रोजगाराची शाश्वती नसल्याने विवाह सोहळे लांबणीवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:20 IST2021-07-27T04:20:50+5:302021-07-27T04:20:50+5:30

लातूर : कोरोनाकाळात अनेकांना नोकरीवरून कमी करण्यात आले. त्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असल्याने रोजगाराची शाश्वती राहिलेली नाही. परिणामी, विवाह ...

Wedding ceremonies postponed due to lack of job security! | रोजगाराची शाश्वती नसल्याने विवाह सोहळे लांबणीवर!

रोजगाराची शाश्वती नसल्याने विवाह सोहळे लांबणीवर!

लातूर : कोरोनाकाळात अनेकांना नोकरीवरून कमी करण्यात आले. त्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असल्याने रोजगाराची शाश्वती राहिलेली नाही. परिणामी, विवाह सोहळे लांबणीवर पडत आहेत. गेल्या चार वर्षांत ३१८ जणांनी नोंदणी पद्धतीने विवाह केले असून, कोरोनामुळे अनेकांच्या हातचे काम गेले आहे. त्यामुळे नोकरीच नसल्याने स्थळ शोधण्यासाठी अडचणी येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईल आणि परिस्थिती पूर्वपदावर आल्यावर नोकरी मिळेल, अशी अनेकांना अपेक्षा आहे. त्यामुळे अनेकजण सद्यस्थितीत विवाह लांबणीवर टाकत असल्याचे चित्र आहे.

नोंदणी विवाहाचे प्रमाण वाढले...

जिल्ह्यात गेल्या चार वर्षांत ३१८ जणांचे विवाह नोंदणी पद्धतीने झाले आहेत. त्यांना विवाहाचे प्रमाणपत्रही देण्यात आले आहे. कोरोनामुळे विवाह समारंभांवर उपस्थितीच्या मर्यादा आहेत. त्यामुळे अनेकांनी मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत नोंदणी पद्धतीनेच विवाहाला पसंती दिली आहे. - सतीश बनसोडे, विवाह नोंदणी अधिकारी

२०१९ मध्ये सर्वाधिक ९४ विवाह...

२०१८ - ७९

२०१९ - ९४

२०२० - ९२

२०२१ - ५३

कोरोनामुळे नागरिकांच्या उपस्थितीवर निर्बंध असल्याने विवाह सोहळे मोठे झालेले नाही. जुलै २०२१ पर्यंत ५३ जणांनी, तर २०१८ मध्ये ७९, २०१९ मध्ये ९४, तर २०२० मध्ये ९२ जणांचे विवाह नोंदणी पद्धतीने झाले असल्याचे जिल्हा विवाह नाेंदणी अधिकारी कार्यालयाच्यावतीने सांगण्यात आले.

सहा महिन्यांत ५३ जणांचे विवाह...

मागीलवर्षी मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. सध्याही विवाह समारंभांवर मर्यादा आहेत. गेल्या सहा महिन्यांत ५३ जणांचे नोंदणी पद्धतीने विवाह झाले आहेत.

मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत नोंदणी पद्धतीने विवाह झाल्यावर तात्काळ प्रमाणपत्र वितरित करण्यात आले आहे. कमी खर्चात कायदेशीर पद्धतीने विवाह होत असल्याने नोंदणी पद्धतीच्या विवाहास चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.

कठीण काळात दोनाचे चार हात कसे होणार...

शिक्षण पूर्ण होताच पुण्याला नोकरी लागली होती. कोरोनामुळे कर्मचारी कपात करण्यात आली. त्यामध्ये रोजगार गेला. परिणामी, दीड वर्षांपासून नोकरीच्या शोधात असून, सध्या गावीच आहे. नोकरीला असताना कुटुंबीय आणि नातेवाईक विवाहासाठी स्थळ पाहत होते. मात्र, सध्या नोकरी नसल्याने विवाह करण्याचे नियोजन पुढे ढकलले आहे. नोकरी लागल्यावरच याबाबत विचार करणार आहे. - तरुण

कोरोनाच्या संसर्गामुळे नोकरी गेली. कुटुंबीय लग्नासाठी तगादा लावत आहेत; मात्र हाताला काम नसल्याने लग्न झाल्यावर घर कसे चालविणार, हा प्रश्न आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावरच नोकरीची संधी मिळेल. तोपर्यंत घरीच शेतीकामात मदत करीत असून, परिस्थिती पूर्वपदावर आल्यावर लग्नाबाबत विचार करणार आहे. - तरुण

Web Title: Wedding ceremonies postponed due to lack of job security!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.