अहमदपुरातील १२७ गावांचा कारभार दोन मंडल अधिकाऱ्यांवर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:15 IST2021-06-10T04:15:03+5:302021-06-10T04:15:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अहमदपूर : तालुक्यातील १२७ गावांसाठी सहा मंडल असून, या गावांचा कारभार केवळ दोन मंडल अधिकारीऱ्यांवर आहे. ...

अहमदपुरातील १२७ गावांचा कारभार दोन मंडल अधिकाऱ्यांवर !
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदपूर : तालुक्यातील १२७ गावांसाठी सहा मंडल असून, या गावांचा कारभार केवळ दोन मंडल अधिकारीऱ्यांवर आहे. तालुक्यातील ४ पदे रिक्त असून, ऐन पेरणीच्या दिवसात शिव रस्ते चौकशी, निराधारांच्या अनुदानाचा अहवाल यासोबतच अनेक कामे प्रलंबित राहत असल्याने शेतकऱ्यांसह विविध योजनेच्या लाभार्थ्यांना अडचणींना सामाेरे जावे लागत आहे.
अहमदपूर तालुक्यात सहा मंडल असून, १२७ महसुली गावे व ५० वाड्या-तांडे आहेत. त्यात अहमदपूर, शिरूर, हाडोळती, किनगाव, खंडाळी, अंधोरीचा समावेश आहे. प्रत्येक मंडलाला स्वतंत्र मंडल अधिकारी असून, एका अधिकाऱ्याकडे २० ते २५ गावांचा कार्यभार आहे. प्रत्येक मंडल अधिकाऱ्यांना शिव रस्ताचे पंचनामे करणे, चौकशी अहवाल तयार करणे, संगायो, इंगायो, वृद्धापकाळ अनुदान योजनांच्या प्रस्तावाची चौकशी करणे, विहीर अधिग्रहण, पंचनामे करणे, कोरोनाविषयक माहिती जमा करणे, फेरफार चौकशी मंजूर करणे अशी विविध प्रकारचे ८१ कामे करावी लागतात. त्यात अपुऱ्या मनुष्यबळामुळे त्यांना पूर्णवेळ काम करावे लागते. मात्र, तालुक्यातील चार मंडल अधिकाऱ्यांपैकी एक मंडल अधिकारी वैयक्तिक दीर्घ रजेवर असून, एक मंडल अधिकारी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे दोन मंडल अधिकारी सध्या कार्यरत असून, त्यातील मधुकर क्षीरसागर यांच्याकडे अहमदपूर, खंडाळी, हाडोळतीचा कार्यभार असून, सुनीता ताटे यांच्याकडे किनगाव, अंधोरी, शिरूर ताजबंदचा पदभार आहे. त्यामुळे या मंडल अधिकाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त भार असल्यामुळे अनेक लोकोपयोगी कामांमध्ये अडचण येत आहेत. अधिकारी स्वाक्षरी करत नाहीत, उपस्थित राहत नाहीत अशाप्रकारच्या तक्रारी तहसील कार्यालयाला प्राप्त झाल्या आहेत. याबाबत चौकशी केली असता, ६ मंडलांचा प्रभार दोनच मंडल अधिकाऱ्यांवर असल्याने समस्या येत असून, याबाबत वरिष्ठांना अहवाल पाठवला असल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात आले.
शेकडो प्रकरणे प्रलंबित...
१२७ गावांचा कारभार दोनच मंडल अधिकाऱ्यांवर असल्याने अहमदपूर तालुक्यातील शिव रस्त्याचे ६० अर्ज, फेरफारचे ३०, निराधार योजनेचे २५० तर विहीर अधिग्रहणाचे १० प्रस्ताव प्रलंबित आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसह संबंधित गावांमधील ग्रामस्थांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
रिक्त पदांचा प्रस्ताव जिल्हास्तरावर..
मंडल अधिकारी पदाच्या रिक्त जागेचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. तालुक्यातील सहा मंडलांसाठी केवळ दोनच मंडल अधिकारी असून, चार जागा रिक्त आहेत. याबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याचे प्रसाद कुलकर्णी यांनी सांगितले.