निलंगा तालुक्यात कार-दुचाकी अपघातात दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:26 IST2021-09-16T04:26:31+5:302021-09-16T04:26:31+5:30

पोलिसांनी सांगितले, अनसरवाडा येथील सरपंच पद्मिनबाई सुग्रीव उसनाळे यांचे चिरंजीव बालाजी उसनाळे (४० वर्षे) हे निलंगा येथील अडत ...

Two killed in car-two-wheeler accident in Nilanga taluka | निलंगा तालुक्यात कार-दुचाकी अपघातात दोन ठार

निलंगा तालुक्यात कार-दुचाकी अपघातात दोन ठार

पोलिसांनी सांगितले, अनसरवाडा येथील सरपंच पद्मिनबाई सुग्रीव उसनाळे यांचे चिरंजीव बालाजी उसनाळे (४० वर्षे) हे निलंगा येथील अडत व्यापारी असून, सायंकाळी ते गावाकडे निघाले होते. अनसरवाडा पाटीजवळ त्यांच्या शेताच्या दरम्यान ते आले असता, निलंग्याकडून येत असलेल्या भरधाव कारचा ताबा सुटला व बालाजी यांच्या मोटारसायकलवर येऊन आदळली. यात कारला अडकून दुचाकीसह ते जवळपास ५० ते ६० फूट फरपटत गेले, यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच कारमधील तिघे गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातील बालाजी ताकनाटे (५०, रा. कलमुगळी) यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. तर, गहिनीनाथ व्यंकट गोबाडे व महादेव तात्याराव वाघमारे (रा. कलमुगळी) यांना पुढील उपचारासाठी लातूरला हलविण्यात आले आहे. याप्रकरणी नितीन उसनाळे यांनी निलंगा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून कारचालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

अडत व्यापारी निघाले होते गावी...

अनसरवाडा येथील रहिवासी असलेले बालाजी सुग्रीव उसनाळे हे सायंकाळी निलंगा येथून गावाकडे निघाले होते. पाठीमागून आलेल्या कारने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. निलंगा उपजिल्हा रुग्णालय येथे त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. गुरुवारी सकाळी १०.३० वाजता त्यांच्या पार्थिवावर अनसरवाडा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.

Web Title: Two killed in car-two-wheeler accident in Nilanga taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.