गणेशोत्सवामुळे ट्रॅव्हल्सची भाडेवाढ; मुंबईसाठी द्यावे लागतात अधिकचे पैसे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:26 IST2021-09-16T04:26:00+5:302021-09-16T04:26:00+5:30

अहमदपूर : गणेशोत्सवामुळे इतर शहरांकडे जाण्याला नागरिकांची पसंती असते. अनेक नागरिक पर्यटनासाठी व आपल्या गावी जाण्यासाठी बाहेर पडतात. याचाच ...

Travel hike due to Ganeshotsav; More money has to be paid for Mumbai! | गणेशोत्सवामुळे ट्रॅव्हल्सची भाडेवाढ; मुंबईसाठी द्यावे लागतात अधिकचे पैसे !

गणेशोत्सवामुळे ट्रॅव्हल्सची भाडेवाढ; मुंबईसाठी द्यावे लागतात अधिकचे पैसे !

अहमदपूर : गणेशोत्सवामुळे इतर शहरांकडे जाण्याला नागरिकांची पसंती असते. अनेक नागरिक पर्यटनासाठी व आपल्या गावी जाण्यासाठी बाहेर पडतात. याचाच फायदा सध्या खासगी ट्रॅव्हल्सवाले घेताना दिसत आहेत. सुटीच्या पार्श्वभूमीवर खासगी ट्रॅव्हल्सच्या भाड्यात वाढ झाली असून, एसटी व खासगी ट्रॅव्हल्सच्या भाड्याची तुलना करता दोघांमध्ये फारशी तफावत दिसून येत नाही. त्यामुळे लोक खासगी ट्रॅव्हल्सलाच प्राधान्य देत आहेत.

गणेशोत्सवानिमित्त गावी जाण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू आहे. ऐन सणासुदीत अचानक भाडेवाढ करण्याचा निर्णय खासगी बस वाहतूकदारांनी घेतला आहे. परिणामी प्रवास करताना प्रवाशांच्या खिशाला कात्री लागत आहे. मोठ्या प्रमाणात नागरिक खासगी बसमधून प्रवास करताना दिसून येत आहे.

प्रवाशांना फटका...

गणेशोत्सव, महालक्ष्मी या सणासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात आपल्या गावाकडे येतात. खासगी वाहनधारकांनी मोठ्या प्रमाणात तिकिटामध्ये भाडेवाढ केल्यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. - राजेश चिलकरवार

अहमदपूर तालुक्यातील बरीच कुटुंबे उदरनिर्वाहासाठी मुंबई, पुणे शहरांत कामास आहेत. त्यांना सणासुदीच्या काळात मुंबई, पुण्याकडून गावाकडे परत येताना व जाताना अचानकपणे तिकिटामध्ये वाढ केली जात असल्यामुळे आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. - कृष्णा मुंडे

अहमदपूर - मुंबई आधीचे दर ७०० आताचे दर ९००

अहमदपूर- नागपूर आधीचे दर ७०० आताचे दर १०००

अहमदपूर - पूणे आधीचे दर ७०० आताचे दर ९००

अहमदपूर- औरंगाबाद आधीचे दर ६०० आताचे दर ८००

दोन वर्षांनंतर बरे दिवस...

कोरोनामुळे बसेस काही दिवस बंदच होत्या. त्यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. सतत डिझेलचे भाव वाढत असल्याने नाइलाजास्त तिकिटांचे दर वाढवावे लागले आहेत. सणासुदीत ट्रॅव्हल्सला नागरिकांची पसंती असते. इतर वेळेत बसेस रिकाम्याच धावतात. परिणामी, खर्च वाढल्याने दरवाढ करण्यात आली आहे. - रमेश देशमुख, ट्रॅव्हल्स मालक

गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे ट्रॅव्हल्स व्यवसाय संकटात आला आहे. आता परिस्थिती पूर्वपदावर येत असली तरी डिझेलचे भाव सतत वाढत आहेत. सणासुदीत प्रवाशांची गर्दी असते. नुकसान भरून काढण्यासाठी पर्याय नसल्याने दरवाढ केली जात आहे. वाढत्या महागाईमुळे खर्च भागविणे अवघड झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. - ट्रॅव्हल्स मालक

Web Title: Travel hike due to Ganeshotsav; More money has to be paid for Mumbai!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.