लोकसहभागातून शाळेचे पालटले रुपडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:20 IST2021-07-27T04:20:52+5:302021-07-27T04:20:52+5:30
अहमदपूर : तालुक्यातील राळगा तांडा येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांबरोबर गावातील नागरिकांनी शाळेच्या विकासासाठी पुढाकार घेतला आहे. लोकवर्गणी करुन ...

लोकसहभागातून शाळेचे पालटले रुपडे
अहमदपूर
: तालुक्यातील राळगा तांडा येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांबरोबर गावातील नागरिकांनी शाळेच्या विकासासाठी पुढाकार घेतला आहे. लोकवर्गणी करुन वर्गखोल्यांना रंगरंगोटी केली आहे. त्यावर आकर्षक शैक्षणिक चित्रे, अक्षरे काढल्याने भिंती बोलक्या झाल्या आहेत. त्यामुळे शाळेचे रुपडे पालटले आहे.
तालुक्यातील राळगा तांडा हे ५० घरांचे आहे. तांड्यावरील विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण मिळावे म्हणून शासनाने जिल्हा परिषदेची इयत्ता ५ वी पर्यंतची शाळा बांधली आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून बाला उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात शाळेनेही सहभाग नोंदविला आहे. दरम्यान, प्रशासनाकडून आर्थिक मदत न मिळाल्याने गावातील नागरिकांनी लोकवर्गणी करुन आपल्या शाळेचा विकास साधण्याचा ध्यास घेतला आहे. ५७ हजार ४०० रुपये वर्गणी गोळा करण्यात आली.
या वर्गणीतून बाला उपक्रमांतर्गत शाळेच्या संरक्षक भिंतीवर रंगरंगोटी करण्यात आली. अभ्यासक्रमातील अक्षरे, चित्रे रेखाटण्यात आली आहेत. त्यामुळे सहजरित्या विद्यार्थ्यांची नजर गेली की, अक्षरे, उजळणी तोंडपाठ होण्यास मदत होत आहे. ग्रामपंचायत आणि लोकसहभागातून बाला उपक्रमातील बायोगॅस, रेन वॉटर हार्वेस्टिंग, लपंडाव भिंत, सौर घड्याळ, गांडूळ खत निर्मिती, सूर्यमाला, पक्षांसाठी झाडावर अन्न, पाण्याची सोय, शाळेतील झाडांना कठडे बांधणे, रॅम्प, विविध बोर्ड, सुविचार लेखन, चित्रे, नकाशे, जमिनीवर पटाचे खेळ, परसबाग, बैठक व्यवस्था, गिलाव्यात कोरलेली अक्षरे, उंचीनुसार फलक, दिशादर्शक फलक, शब्दभिंती, पत्रपेटी, वर्गातील दिनदर्शिका असे उपक्रम राबविण्यात येत आहेत. तसेच विद्यार्थ्यांचे स्थलांतराचे प्रमाण रोखणे, नवीन अक्षर, शब्द वाक्य बँक असे विविध शैक्षणिक उपक्रम राबविले जात आहेत. त्यासाठी गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे यांचे मार्गदर्शन मिळत आहे.
शाळा सुरु झाल्यानंतर मुले शाळेत आल्यानंतर ती आनंदित राहावीत. शाळेच्या परिसरात त्यांचे मन रमावे, यासाठी हा उपक्रम आहे. या उपक्रमासाठी जिल्हा परिषदेकडून कोणतीच आर्थिक तरतूद नाही. राळगा तांडा येथील सहशिक्षिका कविता गुट्टेवाडीकर व ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून हे काम हाती घेतले आहे. मुख्याध्यापक सुशेन पाटील यांनी पुढाकार घेतला आहे.
ग्रामस्थांची लोकवर्गणीसाठी मदत...
गावची जिल्हा परिषद शाळा भूषण असल्याने राळगा तांडा येथील ग्रामस्थांनी गावातील शाळेचे रूपडे पालटण्यासाठी पुढाकार घेतला. गावातील पालकांनी एकत्र येत आपल्या कुवतीनुसार आर्थिक मदत केली. मुख्याध्यापक सुशेन पाटील यांच्या पुढाकारातून शाळेसाठी हा निधी उभारण्यात आला. ग्रामस्थांनी ५७ हजार ४०० रुपये वर्गणी जमा केली.
मूल्यांकनात शंभर गुण...
केवळ १५ दिवसांत राळगा तांडा जिल्हा परिषद शाळेने बाला मूल्यांकनात १०० पैकी १०० गुण प्राप्त केले आहेत. लोकसहभाग, ग्रामपंचायत, शिक्षकांनी पुढाकार घेतल्यास हा उपक्रम शंभर टक्के
यशस्वी होऊ शकतो, हे आमच्या कामावरून सांगता येईल. १५ ऑगस्टपर्यंत राळगा तांड्यावरील शाळा एक माॅडेल ठरेल, असे मुख्याध्यापक सुशेन पाटील म्हणाले.