अकरावीसाठी विद्यार्थ्यांचा ओढा शहरातील महाविद्यालयांकडे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:14 IST2021-07-19T04:14:27+5:302021-07-19T04:14:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, अकरावी प्रवेशाची लगबग सुरु झाली आहे. ग्रामीण भागातील ...

अकरावीसाठी विद्यार्थ्यांचा ओढा शहरातील महाविद्यालयांकडे !
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, अकरावी प्रवेशाची लगबग सुरु झाली आहे. ग्रामीण भागातील मुले शहरातील महाविद्यालयांत प्रवेश घेण्यासाठी उत्सुक असून, शिक्षण विभागाकडून घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षेनंतरच महाविद्यालय स्तरावर प्रवेश दिले जाणार आहेत. त्यामुळे दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सीईटी परीक्षेच्या तयारीला लागले आहेत.
लातूर शहरात नामांकित महाविद्यालये असून, अकरावीसाठी प्रवेश घेणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. शहरात शैक्षणिक वातावरण असल्याने अकरावीसाठी विविध महाविद्यालयांत प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये चढाओढ दिसून येते. यंदा बहुतांश शाळांचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून, उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळे यावर्षी अकरावी प्रवेशाच्या जागा रिक्त राहण्याची शक्यता कमीच आहे. दरम्यान, दहावीला मूल्यांकनाद्वारे गुण देण्यात आले असल्याने अकरावी प्रवेशासाठी स्वतंत्र सीईटी घेतली जाणार आहे. त्यामुळे सीईटीतील गुणांनुसारच अकरावीला प्रवेश देण्यात येणार असल्याचे महाविद्यालयांकडून सांगण्यात आले.
अकरावीसाठी शहरात प्रवेश का?
लातूर जिल्ह्यात दहावी आणि बारावीच्या उज्ज्वल निकालाची परंपरा कायम आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय तसेच इतर अभ्यासक्रमांसाठी आवश्यक असलेली तयारी शहरातील महाविद्यालयांकडून करुन घेतली जाते. विद्यार्थीही दोन वर्षात कठोर मेहनत घेत यश मिळवतात. त्यामुळे अकरावीसाठी लातूर शहरात प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा सर्वाधिक कल दिसून येतो.
म्हणून घेणार शहरात प्रवेश...
लातूर शहरात नामांकित महाविद्यालये आहेत. नीट, जेईई या अभ्यासक्रमांची महाविद्यालयात चांगली तयारी करुन घेतली जाते. शहरात शैक्षणिक वातावरण असल्याने शहरातील महाविद्यालयांत प्रवेश घेणार आहे. - संकेत शिंदे, विद्यार्थी
दहावी ग्रामीण भागातून झाली असली तरी पुढील अभ्यासक्रमासाठी शहरात प्रवेश घेणार आहे. पालकांचीही तयारी असल्याने शहरातील महाविद्यालयात प्रवेश घेऊन नीट परीक्षेची तयारी करुन वैद्यकीय अभ्यासक्रमाला जायचे ध्येय आहे. - मानसी महामुनी, विद्यार्थिनी
ऑफलाईन प्रवेश व्हावेत...
अकरावीसाठी ऑनलाईनऐवजी ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली पाहिजे. ज्यामुळे प्रवेशाची प्रक्रिया तत्काळ पूर्ण होईल आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाला सुरुवात करता येईल. याबाबत राज्याच्या शिक्षण विभागाने निर्णय घेण्याची गरज आहे. - संस्थाचालक
अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा ओढा शहराकडे अधिक असतो. ऑनलाईन प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण असते. पहिली, दुसरी आणि तिसरी यादी जाहीर होईपर्यंत विद्यार्थ्यांना प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया राबविल्यास सोपे होईल. - संस्थाचालक