नांदेड- लातूर जिल्ह्याच्या सीमेवर कडक नाकाबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:24 IST2021-04-30T04:24:35+5:302021-04-30T04:24:35+5:30
राज्यातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. ...

नांदेड- लातूर जिल्ह्याच्या सीमेवर कडक नाकाबंदी
राज्यातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. ‘ब्रेक द चेन’अंतर्गत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, काही जण रस्त्यावर फिरत असल्याने तसेच परजिल्ह्यात जात असल्याने शासनाने लॉकडाऊन करून प्रवासासाठी पुन्हा ई-पास अनिवार्य केले आहे. अत्यावश्यक कारणांसाठी आंतरराज्य, जिल्ह्याअंतर्गत प्रवासासाठी ई- पास घ्यावा लागत आहे. त्यासाठी लातूर पोलीस विभागाकडून नागरिकांना आवाहनही करण्यात आले आहे.
नांदेड जिल्ह्यातील जांबपासून केवळ एक किमी अंतरावर लातूर जिल्ह्यातील शेवटचा तालुका जळकोट लागतो. लातूर जिल्ह्यात प्रवेश करताना राष्ट्रीय महामार्ग ५० वरील जांब-जळकोट या मार्गावर जांबपासून दीड किमी अंतरावर जळकोट पोलिसांनी चेक नाका उभारला आहे. तिथे लातूरमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक दुचाकी, चारचाकी वाहनांची तपासणी केली जात आहे. ई-पास नसलेल्यांना परत पाठविण्यात येत आहे.
अत्यावश्यक सेवेतील वाहनांना सवलत देण्यात आली आहे. तसेच नांदेड जिल्ह्यातून येणारे सर्व रस्तेही बंद करण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने कंधारहून वाजरंवाडामार्गे जळकोट हा रस्ता असून, कुणकी पॉइंट येथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
तसेच नांदेड जिल्ह्यातील बान्हाळी- रावणकोळा मार्गे जळकोट हा रस्ता असून, श्री गुरुदत्त शाळेजवळ पोलीस बंदोबस्त आहे.
पोलीस बंदोबस्त तैनात...
जिल्ह्याच्या सीमेवर ई- पासद्वारे ये-जा करणाऱ्यांकडून कोरोनाचा संसर्ग होऊ नये. तसेच पासशिवाय कोणीही येऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. परजिल्ह्यातून येणाऱ्यांकडील ई-पासची विशिष्ट अंतर ठेवून पाहणी करावी. पोलिसांनीही आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, अशा सूचना केल्याचे पोलीस निरीक्षक गणेश सोंडारे म्हणाले.
राज्य शासनाने लागू केलेल्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस प्रशासन, आरोग्य विभागाचे कर्मचारी, नगरपंचायतीचे कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. यात प्रामुख्याने पोकॉ. एम.वाय. कासार, पोकॉ. के.टी. शिंदे, पोहेकॉ. माळवदे, पोकॉ. जायेभाये, गृहरक्षक दलाचे जवान आर.एन. दाचावार, एम.बी. तांबोळी, आर.बी. बेग, एस.एस. चव्हाण आदींचा समावेश आहे.