पानगाव : रेणापूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या पानगावात मागील दोन महिन्यांपासून पथदिवे बंद असल्यामुळे ग्रामस्थांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी वाढली आहे.
गावातील उल्हास नगर, आंबेडकर नगर, खाटीक गल्ली, शेरखाने गल्ली, कुरे गल्ली, शिवाजी नगर, संभाजी महाराज चौकातून रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पथदिवे मागील दोन महिन्यांपासून बंद आहेत. या संदर्भात ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याची ओरड आहे. रात्रीच्यावेळी आबालवृध्दांना चाचपडत मार्ग काढावा लागत आहे. अंधार असल्याने भुरट्या चोऱ्याही वाढल्या आहेत. आंबेडकर नगर, आंबेडकर चौक, संभाजी चौक, गांधी चौक आदी भागातील पथदिवे व सौरऊर्जेवरील पथदिवे अनेक दिवसांपासून बंद असल्याने गैरसोय वाढली आहे. ग्रामपंचायतीने बंद पडलेले पथदिवे तत्काळ चालू करावेत, अशी मागणी होत आहे.