लातूर : जिल्ह्यातील खरिपातील प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनची आवक बाजारपेठेत घटली आहे. दरम्यान, मागणी वाढत असल्याने दरात वाढ झाली आहे. शनिवारी आवक ८ हजार ५८ क्विंटल झाली, तर सर्वसाधारण दर ५ हजार ३०० रुपये प्रति क्विंटल असा मिळाला.
यंदा सोयाबीनचे उत्पादन घटले असून, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खाद्यतेलाच्या दरात आणि पेंढीच्या मागणीत वाढ झाल्याने सोयाबीनच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. हमीभाव ३ हजार ७८० रुपये असा असताना मागणी वाढल्याने दरात वाढ झाली आहे. शनिवारी सोयाबीनला कमाल दर ५ हजार ४५४ रुपये, तर किमान दर ५ हजार २४० रुपये आणि सर्वसाधारण दर ५ हजार ३०० रुपये प्रति क्विंटल असा मिळाला.
दरम्यान, हरभऱ्याची आवक वाढत असून, १५ हजार ७३६ क्विंटल झाली आहे. कमाल दर ४ हजार ८६० रुपये, सर्वसाधारण भाव ४ हजार ७५० रुपये असा मिळाला आहे.