अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्याने मोघा ओढत केली पेरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:46 IST2020-12-11T04:46:11+5:302020-12-11T04:46:11+5:30
मसलगा : निलंगा तालुक्यातील मसलगा येथील अतिवृष्टीग्रस्त एका शेतकऱ्याने तुरीचे पीक उखडून टाकले आणि नव्या उमेदीने उसाची लागवड केली. ...

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्याने मोघा ओढत केली पेरणी
मसलगा : निलंगा तालुक्यातील मसलगा येथील अतिवृष्टीग्रस्त एका शेतकऱ्याने तुरीचे पीक उखडून टाकले आणि नव्या उमेदीने उसाची लागवड केली. मोघाच्या सहाय्याने आंतरपीक म्हणून हरभऱ्याची लागवड करण्यास सुरुवात केली आहे.
ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीने उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी उभ्या पिकांवर नांगर फिरविला होता. मसलगा येथील शेतकरी तुळशीदास साळुंके यांनी एक हेक्टरवर टोकन पध्दतीने सोयाबीन व तुरीची लागवड केली होती. परंतु, अतिवृष्टीमुळे दोन्ही पिके हातची गेली. पाण्यामुळे तुरीचा खराटा झाल्याने हे पीक उखडून टाकले.
पुन्हा नव्या उमेदीने चार फूट सरी सोडून नोव्हेंबरमध्ये ऊस लागवड केली. सध्या अल्पशा पाण्यावर ड्रिपच्या साह्याने जमीन भिजवून अडीच एकर शेतीमध्ये आंतरपीक म्हणून मोघा हाताने ओढून हरभऱ्याची पेरणी केली आहे.
ऊस लागवडीमुळे बैलावरुन पेरणी अशक्य...
गोमूत्रापासून जीवामृत तयार करुन दोन डोळा पद्धतीच्या बेण्यास सात मिनिटे भिजवून ठेवल्याने खोड किडीपासून उसाचे संरक्षण होते. ऊस लागवड केल्याने बैल अथवा ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणी करणे शक्य नसल्याने मळ्याच्या साह्याने हाताने ओढून एक हेक्टरवर हरभऱ्याची साखळी पद्धतीने पेरणी केल्याचे तुळशीदास साळुंके यांनी सांगितले.
५० टक्के मदतीचे वाटप...
ऑक्टोबरमधील अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाले. परंतु, अद्यापही शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. त्यामुळे मदतीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.
तालुक्यातील ५० टक्के शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित शेतकऱ्यांना शासनाकडून निधी उपलब्ध होताच मदत देण्यात येईल, असे तहसीलदार गणेश जाधव यांनी सांगितले.
***