मांजरा धरणाचे सहा दरवाजे उघडले; ४१ वर्षांत १४ वेळा धरण भरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:22 IST2021-09-23T04:22:22+5:302021-09-23T04:22:22+5:30
धनेगाव येथे मांजरा प्रकल्पाची उभारणी १९८०-८१ मध्ये झाली. त्यानंतर पहिल्यांदा १९८८-८१ मध्ये धरण भरले. सलग तीन वर्षे धरण भरल्याने ...

मांजरा धरणाचे सहा दरवाजे उघडले; ४१ वर्षांत १४ वेळा धरण भरले
धनेगाव येथे मांजरा प्रकल्पाची उभारणी १९८०-८१ मध्ये झाली. त्यानंतर पहिल्यांदा १९८८-८१ मध्ये धरण भरले. सलग तीन वर्षे धरण भरल्याने सिंचनाला पाणी सोडण्यात आले होते. १९९१ ते १९९६ पर्यंत सहा वर्षे धरण भरले नाही. परिणामी, लातूर शहरासह प्रस्तुत शहरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागला होता. सहा वर्षांच्या खंडानंतर १९९६-९७ मध्ये पुन्हा धरण भरले. त्यानंतरच्या पावसाळ्यामध्ये मात्र धरणात नवीन पाणीसाठा होऊ शकला नाही. मात्र, एक वर्षाच्या खंडानंतर १९९८ मध्ये झालेल्या पावसाळ्यात पुन्हा धरण भरले. सलग पाच वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वर्षे धरण कधीच भरलेले नाही. सलग तीन वर्षे धरण भरल्याची उदाहरणे आहेत. मांजरा प्रकल्पांतर्गत अनेक गावांचा पाणीपुरवठा, तसेच सिंचन असल्यामुळे प्रकल्प क्षेत्रात बऱ्यापैकी पाऊस होऊ शकला नाही. त्यामुळे नव्याने पाणीसाठा उपलब्ध होऊ शकला नाही. यंदा मात्र प्रकल्प शंभर टक्के भरल्याने प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून मंगळवारी पाणी सोडून देण्यात आले होते. परंतु, मोठ्या प्रमाणात येवा सुरू असल्याने पाणीसाठा नियंत्रणात ठेवण्यासाठी धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले असल्याची माहिती शाखा अभियंता शाहूराज पाटील यांनी दिली.
१४ वेळा भरलेल्या पाण्यावर भागविली तहान
१९८० पासून फक्त १४ वेळा धरण भरले आहे. त्यावरच लातूरसह या धरणावर अवलंबून असलेल्या गावांची तहान भागविण्यात आली. २०१६ च्या उन्हाळ्यात तर अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली होती. या टंचाईत रेल्वेने पाणी आणून लातूरकरांची तहान भागवावी लागली होती. त्यांनतर धरणात पिण्याकरता पाणीसाठा झाला. आता सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले आहे. यामुळे लातूरला दिलासा मिळाला आहे.
धरण शंभर टक्के भरलेले वर्ष....
१९८८-८९
१९८९-९०
१९९०-९१
१९६-९७
१९९८-९९
२०००-०१
२००५-०६
२००६-०७
२०१०-११
२०११-१२
२०१६-१७
२०१७-१८
२०२०-२१