जिल्ह्यात १११ गावात पाणीटंचाईच्या झळा तीव्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:17 IST2021-05-30T04:17:19+5:302021-05-30T04:17:19+5:30
उन्हाची तीव्रता सध्या वाढत असून, गतवर्षीच्या तुलनेत अधिग्रहण आणि टँकरच्या मागणी घट झाली आहे. पंचायत समिती स्तरावर ९३ गावे ...

जिल्ह्यात १११ गावात पाणीटंचाईच्या झळा तीव्र
उन्हाची तीव्रता सध्या वाढत असून, गतवर्षीच्या तुलनेत अधिग्रहण आणि टँकरच्या मागणी घट झाली आहे. पंचायत समिती स्तरावर ९३ गावे आणि १८ वाड्यानी प्रस्ताव दाखल केले आहेत. यामध्ये लातूर तालुक्यातील १३, औसा ७, निलंगा १२, रेणापूर २२, अहमदपूर ५१, चाकूर ११, शिरूर अनंतपाळ १, उदगीर ५ तर जळकोट तालुक्यातील ९ प्रस्तावांचा समावेश आहे. तहसील कार्यालय स्तरावर ९६ तर पंचायत समिती स्तरावर १६ प्रस्ताव प्रलंबित आहेत. उपविभागीय अधिकारी यांनी २२ प्रस्तावांना अधिग्रहणाची परवानगी दिली असून, यामध्ये लातूर १, अहमदपूर १७ तर जळकोट तालुक्यातील १ प्रस्ताव आहे. सध्या २२ गावांना विहीर आणि विंधन विहिरीचे अधिग्रहण करून पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी ११ कोटी रुपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार नवीन विंधन विहीर घेणे, तात्पुरत्या पूरक नळ योजना राबविणे, प्रगतीपथावरील योजना पूर्ण करणे आदी योजनांचा समावेश आहे. पंचायत समिती स्तरावर प्राप्त झालेले प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे जात असून, त्यानंतर उपविभागीय अधिकारी यांच्या मंजुरीने अधिग्रहण केले जात आहे. गतवर्षी परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने पाणीपातळीत काही प्रमाणात वाढ झाली होती. परिणामी, गतवर्षीच्या तुलनेत अधिग्रहण आणि टँकरच्या मागणी घट झाली असल्याचे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
रेणापूर, अहमदपूर, जळकोटमधून टँकरची मागणी...
टँकरने पाणीपुरवठा करावा या मागणीसाठी रेणापूर, अहमदपूर, जळकोट या तीन तालुक्यातील प्रत्येकी एक ग्रामपंचायतीने पंचायत समितीकडे प्रस्ताव सादर केले आहेत. या प्रस्तावांना अद्याप मंजुरी मिळाली नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, अधिग्रहण, टँकरचे प्रस्ताव दाखल झाल्यानंतर संबंधित यंत्रणेच्या वतीने गावात जाऊन पडताळणी केली जात आहे. त्यानंतर सदरील प्रस्तावाला मंजुरी देण्यात येत आहे.