सात हजार जणांनी केला दृष्टिदानाचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:25 IST2021-09-08T04:25:40+5:302021-09-08T04:25:40+5:30
उदगीर : आपल्या मृत्यूनंतर आपले डोळे कोणाच्या तरी कामी येतात ही जाणीव ठेवून सात हजार जणांनी ...

सात हजार जणांनी केला दृष्टिदानाचा संकल्प
उदगीर : आपल्या मृत्यूनंतर आपले डोळे कोणाच्या तरी कामी येतात ही जाणीव ठेवून सात हजार जणांनी येथील उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालयाच्या माध्यमातून दृष्टिदानाचा संकल्प केला आहे. नेत्रदानाच्या या यज्ञातून ३६० जणांना हे जग पाहता आले असून, मरावे परी नेत्ररूपे उरावे, या वचनाची सार्थकता सिद्ध झाली आहे.
२६ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर हा नेत्रदान पंधरवडा म्हणून साजरा केला जातो. भारतात आजही नेत्रपटलाअभावी ५० लाख लोक पाहू शकत नाहीत. नेत्रदानाच्या बाबतीत आजही आपल्या देशात उदासीनता असून, दरवर्षी ९५ लाखांच्या आसपास मृत्यू होत असताना ही केवळ पन्नास हजार जणच नेत्रदान करतात. मृत्यूनंतर आपले डोळे कोणाच्या तरी कामाला येतील या भावनेने होणाऱ्या एकाच्या नेत्रदानामुळे दोघांना दृष्टी मिळते. ही बाब लक्षात घेऊन उदयगिरी लॉयन्स नेत्ररुग्णालयाने जनतेमध्ये नेत्रदानाबाबत जाणीव जागृती करीत हजारो जणांना नेत्रदानाचे महत्त्व पटवून दिले आहे. त्यातून ९०० जणांनी यावर्षी नेत्रदानाचा संकल्प केला आहे. त्यापैकी ५०० जणांनी दृष्टिदानाचे संकल्प पत्र भरून दिले आहेत. हा यज्ञ सुरू झाल्यापासून आजपर्यंत ३६० जणांना दृष्टी मिळाल्याने नेत्रदाते शरीराने गेले तरी दृष्टी ने अमर झाले आहेत.
नेत्रदान चळवळीला गती...
कोरोनामुळे अंधत्व निवारण व नेत्रदान चळवळीला अनेक अडचणी आल्या. मात्र याच पंधरवड्यात आम्ही ही चळवळ गतिमान करण्यासाठी जाणीव जागृती केली असून, यशही आले आहे. बहुतांश रुग्णांचे डोळे हे संसर्गामुळे खराब होतात. अशा रुग्णांना नवीन दृष्टी मिळविण्यासाठी बुबुळ (कॉनिआ) महत्त्वाची भूमिका बजावते. मृत्यूनंतर नेत्रदान करणाऱ्यांचे डोळेच काढले जातात, असा गैरसमज आहे. परंतु नेत्रदान करताना संबंधित मृत व्यक्तीचे केवळ कॉनिआ पटल काढले जाते. यामुळे चेहरा जरासाही विद्रूप होत नाही. गरजवंत कुणाही रुग्णांना हे कार्निआ दान करता येते. असे उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. रामप्रसाद लखोटीया यांनी सांगितले.