जानवळ (जि.लातूर) : बैलगाडी उलटल्याने एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना चाकूर तालुक्यातील जानवळ शिवारात बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. शंतनू रामदास जानवळकर (११) असे मयत मुलाचे नाव आहे. शंतनू हा वडीलांसोबत बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास शेतात बैलगाडीसोबत गेला होता.
कोरोनामुळे शाळा बंद असल्याने शंतनू हा सध्या वडीलांसोबत शेताला नेहमी जात होता. बैलगाडीतून सोयाबीन गुळी वाहतूक केली जात होती. दरम्यान, बैलगाडी अचानक उलटली. या अपघातात शंतनूच्या डोक्याला जबर मार लागला. यावेळी रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेने जानवळ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.