स्कुल बस चालकांची होतेय उपासमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:34 IST2020-12-13T04:34:14+5:302020-12-13T04:34:14+5:30

लातूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे शाळा बंद झाल्या, परिणामी स्कुलबसची चाकेही थांबली. महिना, दोन महिने, तीन ...

School bus drivers are starving | स्कुल बस चालकांची होतेय उपासमार

स्कुल बस चालकांची होतेय उपासमार

लातूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे शाळा बंद झाल्या, परिणामी स्कुलबसची चाकेही थांबली. महिना, दोन महिने, तीन महिने वाट बघून काहींनी नोकरी सोडून गाव गाठले. तर काही स्कुलबस चालक, मालकांनी नवीन व्यवसाय सुरू केला आहे. संसाराचा गाडा बसवरच अवलंबून असणारे अनेक मालक विविध अडचणींचा सामना करीत आहेत.

लातूर जिल्ह्यात जवळपास दीड ते दोन हजार स्कुलबसची संख्या असली तरी केवळ ७०० लोकांकडे त्याचा परवाना आहे. विनापरवाना विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या यापेक्षा दुप्पट आहे. लातूर, उदगीर व अहमदपूर शहरात स्कुलबसची संख्या लक्षणीय आहे. याशिवाय ग्रामीण भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी खाजगी वाहने आहेत. लॉकडाऊनमुळे शाळा बंद झाल्या, बारा महिने विद्यार्थी वाहतूक एवढाच व्यवसाय करणारे बसमालक आणि चालक दोघेही अडचणीत सापडले आहेत. काहींनी भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला असून काहींनी मजुरीला पसंती दिली आहे. अनेकांनी कर्जाचे हप्ते थकल्याने बसच बाहेर काढल्या नाहीत. मागील आठ महिन्यांपासून चालक आणि मालक दोघेही शाळा कधी सुरू होणार याकडे लक्ष देऊन आहेत.

भाजीपाला विक्री, बांधकाम मजुरी...

विद्यार्थी वाहतूक करून मिळणाऱ्या उत्पन्नावरच घरगाडा चालविणारे अनेकजण भाजीपाला विक्रीकडे वळले आहेत. काहींनी हिवाळ्यात उबदार कपड्यांचा व्यवसाय सुरू केला. तर चालक म्हणून काम करणारे बरेचजण गावी परतले. शहरातील काहींनी मजुरी सुरू केली. जेव्हा शाळा सुरू होतील, पालक प्रतिसाद देतील, तेव्हाच गाडी धावणार असल्याचे चालकांनी सांगितले.

बसेस जागेवरच उभ्या...

लॉकडाऊन झाल्यापासून बसेस जाग्यावर उभ्या आहेत. कर्जाचे हप्ते थकल्याने बँकांनी तगादा लावला आहे. दंडाची रक्कम वाढली. शासनाने स्कुलबस चालकांना आधार देण्यासाठी थकित कर्ज माफ करावे. बँका, फायनान्स कंपन्यांच्या छळातून दिलासा देण्यासाठी उपायोजनना कराव्यात. आता दहावीचे वर्ग सुरू झाले असले तरी पालकांचा फारसा प्रतिसाद नाही. आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. - युसूफ फारूखी, बस मालक

कधी तरी लग्नाचे भाडे केले...

आठ महिन्यांपासून बसेस शाळेत लावल्या आहेत. चालकही सोडून गेले. थकित कर्ज भरण्यासाठी बँकांकडून वारंवार तगादा आहे. कधीतरी एखाद दुसरे लग्नाचे भाडे लागते, त्यातून मेंटनन्सचा खर्च भागविला. केवळ बसवरच उपजिविका असणारे अनेकजण हा व्यवसाय सोडून इतर कामाला लागले आहेत. बालाजी नागिमे, बस मालक

Web Title: School bus drivers are starving

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.