जिल्ह्यात संततधार; रेणा मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:25 IST2021-09-08T04:25:12+5:302021-09-08T04:25:12+5:30
जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार आहे. सर्वच महसूल मंडळात दमदार पाऊस झाला असून ओढ्या नाल्यांना पाणी आले आहे. मांजरा ...

जिल्ह्यात संततधार; रेणा मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो !
जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार आहे. सर्वच महसूल मंडळात दमदार पाऊस झाला असून ओढ्या नाल्यांना पाणी आले आहे. मांजरा नदीवरील टाकळगाव बॅरेजमध्ये ७७,वांजरखेडा ८५, वांगदरी ८९, कारसा-पोहरेगाव ९०, नागझरी ९५, बिंदगीहाळ ८५, डोंगरगाव ८७,आणि होसुर बॅरेजेस १०० टक्के भरला आहे. गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे मांजरा नदीपात्रात १८५ किलोमीटर पर्यंत पाणी स्थिरावले आहे. जिल्ह्यातील लातूर,अहमदपूर, उदगीर, औसा,निलंगा,चाकूर,रेणापूर, देवणी, जळकोट आणि शि.आनंतपाळ तालुक्यातील सर्वच महसूल मंडळात पाऊस झाल्याने पाण्याचा संचय मोठ्या प्रमाणात झाला आहे. सोमवारी रात्रभर पावसाची रिपरिप जिल्ह्यात सुरू होती. मंगळवारीही दिवसभर संततधार असल्याने सूर्यदर्शन झाले नाही. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून रीना मध्यम प्रकल्पातील पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. रेणापूर तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. यातील एक दोन महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याचेही महसूल विभागाच्या वतीने सांगण्यात आले. रविवारी रात्री आणि सोमवारी तसेच मंगळवारी झालेल्या पावसात रेणापूर तालुक्यामध्ये अनेक खरिपातील पिकांचे नुकसान झाले आहे. रेणापूर तालुक्यातील अनेक गावांच्या शिवारातील ऊस आडवा झाला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाच्या वतीने या नुकसानीची पाहणी करण्यात आली आहे.
मांजरा धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ...
लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पातही झपाट्याने वाढ होत आहे. सध्या धरण ६१.२ टक्के भरले असून त्यात ५०.६४ टक्के उपयुक्त साठा आहे. धरण क्षेत्रात कालपासून पाऊस होत असल्याने पाण्याची आवक वाढली आहे. सध्या धरणात एकूण साठा १३६.७५२ दलघमी इतका झाला आहे. यातील उपयुक्त पाणीसाठा ८९.६५२ दलघमी आहे. तर पाणी पातळी ६३९.९० मीटरवर आली आहे.
पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली...
लातूर शहरासह केज, धारूर, अंबाजोगाई, कळंब, मुरुड, लातूर एमआयडीसी आणि औसा एमआयडीसीला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पात १३६.७५२ दलघमी पाणीसाठा झाला असून, पाणी पातळी ६३९.९० मीटरवर आली आहे. एकूण पाणीसाठा ६१.२ टक्के झाला असून, उपयुक्त पाणीसाठा ५०.६४ टक्के झाला आहे. याशिवाय, मांजरा, रेणा, तेरणा आणि तावरजा नदीवरील सर्वच बॅरेजेस भरले आहेत. यामुळे लातूर शहराच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.