रेणा प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडून नदीपात्रात पाणी सोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:25 IST2021-09-08T04:25:18+5:302021-09-08T04:25:18+5:30
चार वर्षांमध्ये रेणा मध्यम प्रकल्प हा पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेने भरला असून यावर अवलंबून असणाऱ्या पाणी पुरवठा योजना व सिंचनाचा ...

रेणा प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडून नदीपात्रात पाणी सोडले
चार वर्षांमध्ये रेणा मध्यम प्रकल्प हा पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेने भरला असून यावर अवलंबून असणाऱ्या पाणी पुरवठा योजना व सिंचनाचा प्रश्न मिटला आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्यातील शेतकरी व नागरिक आनंदित आहेत. रेणापूर तालुक्यांमध्ये गेल्या आठ दिवसापासून मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली. ऑगस्टच्या सुरुवातीला रेणा मध्यम प्रकल्पात १४ टक्के जलसाठा होता. मुरंबी व जोगाईवाडी हे धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने त्याच खाली असलेला रेणा मध्यम प्रकल्प हा भरण्यास सुरुवात झाली, बघता बघता पाच दिवसांमध्येच हे धरण पूर्ण क्षमतेने भरले. या धरणात मोठ्या प्रमाणात येवा येत असल्यामुळे मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता या धरणांमध्ये ९६ टक्के जलसाठा जमा झाला. सततच्या पावसामुळे पाण्याचा वेग वाढत गेला, मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता रेण मध्यम प्रकल्पाचे प्रथम दहा सेंटिमीटर दोन दरवाजे उघडण्यात येऊन १७.८२ क्युमेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यानंतर प्रकल्पाचे सहाही दारे १० सेमीने ११.४५ वाजता उघडण्यात येऊन नदीपात्रात ५३.४६ क्युमेक्स विसर्ग ने पाणी सोडण्यात आले. रेणा मध्यम प्रकल्पातून दुपारी १२.४५ वाजण्याच्या सुमारास ७१.६३ क्युसेक एकूण विसर्ग करण्यात आला. या पाण्यामुळे नदीला पूर आला असून जुन्या पुलावरून पाणी वाहत आहे. प्रकल्पातून सोडलेले पाणी बघण्यासाठी रेणा नदीच्या नवीन मोठ्या पुलावर नागरिकांनी मोठी गर्दी केली. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रेेणापूर पोलीस कर्मचारी यांचाा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
चार वर्षांत पहिल्यांदा भरला प्रकल्प...
सततच्या पावसामुळे आणि मुरंबी, जोगाईवाडी हे धरण भरल्याने रेेणा मध्यम प्रकल्पात मोठ्या प्रमाणात येवा येत होता. त्यामुळे हा प्रकल्प साडेनऊ वाजता ९६ टक्के भरला. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून साडेदहा वाजता प्रथम दोन दरवाजे उघडून रेणा नदीपात्रात पाणी सोडले. नंतर टप्प्याटप्प्याने सहाही दरवाजे उघडण्यात आल्याचे शाखा अभियंता श्रीनाथ कुलकर्णी यांनी सांगितले.
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचे आदेश...
पाण्याची येण्याची क्षमता पाहून दरवाजे बंद किंवा उघडण्याची प्रक्रिया चालू राहील. त्यामुळे या नदीपात्रावरील शेतकरी, गावकऱ्यांनी सतर्क राहावे, असे आवाहन तहसीलदार राहुल पाटील यांनी सांगितले. दरम्यान, रेणापूरचे उपनगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे, नगरपंचायत प्रशासन, पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट हे लक्ष ठेवून आहेत.