लातूर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस; नद्या, नाले वाहू लागले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:25 IST2021-09-08T04:25:27+5:302021-09-08T04:25:27+5:30
रेणापूर तालुक्यात आठ दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे तसेच मुरंबी व जोगाईवाडी धरणे भरल्याने रेणा मध्यम प्रकल्प हा पूर्ण क्षमतेने ...

लातूर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस; नद्या, नाले वाहू लागले
रेणापूर तालुक्यात आठ दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे तसेच मुरंबी व जोगाईवाडी धरणे भरल्याने रेणा मध्यम प्रकल्प हा पूर्ण क्षमतेने मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता भरला. त्यामुळे प्रथम साडेदहा वाजता रेणा मध्यम प्रकल्पातून दोन दरवाजे उघडून नदीपात्रात पाणी सोडून देण्यात आले. दुपारी पावणेएक वाजता प्रकल्पाचे सहाही सर्व दरवाजे उघडण्यात आले. सोमवारी रात्री आठ वाजल्यापासून मंगळवारी दिवसभर संततधार सुरूच आहे.
उदगीर तालुक्यात मंगळवारी पहाटेपासून पडलेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील सर्वच नदी-नाल्यांना पाणी आले आहे. तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतामध्ये ठीकठिकाणी पाणी साचले आहे. काढणीसाठी आलेले उडीद व मुगाच्या शेंगांना आता कोंब फुटू लागले आहेत. अहमदपूर तालुक्यातील खानापूर येथे किनगाव - लातूर राज्यमार्गावरील पूल पाण्याखाली गेला असून वाहतूक पूर्णपणे खंडित झाली आहे. अहमदपूर शहरात सोमवारी रात्रीपासून मंगळवार दुपारपर्यंत पाऊस पडल्याने शहरातील नांदेड रोडवरील कराड नगर भागातील काही नागरिकांच्या घरांत नालीचे पाणी शिरले. निलंगा तालुक्यासह औराद परिसरातील तेरणा व मांजरा या दाेन्ही नद्यांना पूर आला आहे. नदीवरील सर्व बंधारे भरल्याने पाणी सोडण्यात आले आहे. नदीपलीकडील कर्नाटक व महाराष्ट्रातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. औरादसह परिसरातील अनेक गावांत सखल भागात पाणी साचले आहे. अनेक घरांची पडझड झाली आहे. लातूर शहरातील खनी भागातील गायत्रीनगर येथे गटारीचे पाणी तुंबल्याने ते काही घरांत शिरले. त्यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला. चाकूर, जळकाेट, देवणी, शिरूर अनंतपाळ आदी तालुक्यांतील नाले वाहत आहेत.
मांजरा प्रकल्पात ६१ टक्के पाणी...
लातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पात २४ तासात १० टक्के पाण्याची वाढ झाली आहे. प्रकल्प क्षेत्रात चांगला पाऊस होत असल्याने पाण्याचा येवा सुरू असल्याची माहिती शाखा अभियंता शाहूराज पाटील यांनी दिली.