माल धक्क्यातून रेल्वेला मिळाले चार कोटींचे उत्पन्न !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:23 IST2021-09-22T04:23:09+5:302021-09-22T04:23:09+5:30

उदगीर : येथील रेल्वेस्थानकाच्या मालधक्क्याहुन झालेल्या वाहतूकीने रेल्वेला ४ कोटी १८ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. आतापर्यंत सोयाबीन आणि ...

Railways gets Rs 4 crore from freight shock | माल धक्क्यातून रेल्वेला मिळाले चार कोटींचे उत्पन्न !

माल धक्क्यातून रेल्वेला मिळाले चार कोटींचे उत्पन्न !

उदगीर : येथील रेल्वेस्थानकाच्या मालधक्क्याहुन झालेल्या वाहतूकीने रेल्वेला ४ कोटी १८ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. आतापर्यंत सोयाबीन आणि साखर वाहतूक झाली असून कृषीमाल वाहतुकीसाठी मंजूरी प्राप्त झाली आहे. त्यामुळे शेतक-यांना आपला माल विक्री करण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे.

उदगीरला पूर्वी रेल्वे स्थानकावर मालधक्का होता. कालांतराने तो नामशेष झाला. हा मालधक्का पूर्ववत होण्यासाठी उदगीर रेल्वे संघर्ष समितीने सातत्याने पाठपुरावा केला. परिणामी, मालवाहतूकसाठी रेल्वे प्रशासनाने परवानगी दिली. या संधीचे सोने करीत उदगीर येथील व्यापाऱ्यांनी सोयाबीनची वाहतूक करीत पहिल्या टप्प्यात ३८ लाख रुपयांची भाडे देणारे बुकिंग पूर्ण केले. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातही ३८ लाख भाडे देणारी सोयाबीन वाहतूक करण्यात आली. या दोन टप्प्यात मिळून एकूण ८६ लाख रुपये उत्पन्न रेल्वेला झाले. तिसऱ्या टप्प्यात ३१ हजार बॅग २४ बोगीतून भालकेश्वर साखर कारखान्याची साखर मुंबई येथे पाठविण्यात आली. या भाड्यापोटी रेल्वेला १० लाख रुपये प्राप्त झाले. या दरम्यान उदगीर रेल्वे संघर्ष समितीचे सचिव मोतीलाल डोईजोडे व स्टेशन अधीक्षक दीपक जोशी यांनी विविध व्यापारी व कारखान्यांना भेट देऊन या वाहतुकीचे महत्व व फायदा जाणीव करून दिल्यानंतर आता वाहतूक बुकिंग वाढत आहेत. आतापर्यंत ४ कोटी १८ लाख रुपयांचे भाडे रेल्वेला प्राप्त करुन देणारी वाहतूक उदगीर रेल्वे स्थानकातून झाली आहे. उदगीर व परिसरातील व्यापारी आणि कारखान्यांनी स्वस्त व सुरक्षित वाहतूक असणाऱ्या रेल्वे वाहतुकीचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्टेशन अधीक्षक दीपक जोशी, रेल्वे संघर्ष समिती सचिव मोतीलाल डोईजोडे यांनी केले आहे.

रेल्वे स्थानकातून शेतीमालाच्या निर्यातीसाठी मंजूरी...

उदगीर येथील रेल्वे स्थानकातून शेतीमाल करण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेने नुकतीच मंजुरी दिली आहे. यामुळे रेशीम, भाज्या, फळे, फुले आदी कमी प्रमाणात असतील तरीही शेतकरी मोठ्या बाजारपेठेपर्यंत स्वस्त दरात वाहतूक करू शकतील. त्यामुळे शेतकरी कमी भावात मोठ्या बाजारपेठपर्यंत आपला माल वाहतूक करून विक्री करू शकतील.

Web Title: Railways gets Rs 4 crore from freight shock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.