रेशनच्या धान्याला मिळतोय १५ रुपयांचा भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:25 IST2021-09-15T04:25:02+5:302021-09-15T04:25:02+5:30
लातूर जिल्ह्यात ५ लाख ९ हजार २७० रेशन कार्डधारक आहेत. त्यात ३ लाख ३० हजार केशरी, ४२ हजार अंत्योदय ...

रेशनच्या धान्याला मिळतोय १५ रुपयांचा भाव
लातूर जिल्ह्यात ५ लाख ९ हजार २७० रेशन कार्डधारक आहेत. त्यात ३ लाख ३० हजार केशरी, ४२ हजार अंत्योदय व एपीएलचे ६६ हजार ३०० लाभार्थी आहेत. यातील शेतकरी कुटुंबांना गहू २ रुपये तर तांदूळ ३ रुपये किलोप्रमाणे दिले जातात. अंत्योदय व दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना धान्य मोफतच दिले जाते. कोरोना काळात अनेकांचे काम गेले, त्यामुळे त्यांची उपासमार होऊ नये म्हणून शासनाने गरिबांना पोटभर अन्न मिळावे या हेतूने मोफतही धान्य दिले. स्वस्त धान्य दुकानातून मिळणारे हे धान्य काळ्या बाजारात जात असल्याचे समोर आले आहे.
स्वस्त धान्य दुकानातून मिळणारे प्रति ३ रुपये किलो गहू व २ किलो तांदूळ काही कुटुंबात अतिरिक्त ठरत आहे. काहीजण धान्याची गुणवत्ता नसल्याने तर काहीजण अधिकची साठवणूक झाल्याने विक्री करीत आहेत. बाजारात चांगले गहू ३० ते ३५ रुपये, तांदूळ किमान ३० ते ७० रुपये किलोप्रमाणे आहेत. पाव, ब्रेड, बिस्कीट, पापड्या, पशुखाद्य बनिवणाऱ्या काही कंपन्या स्वस्तात मिळणारे रेशनचे धान्य खरेदी करीत आहेत. यासाठी गल्लीबोळात धान्य जमा करून विक्री करणाऱ्यांच्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत.
गल्लीबोळात फिरताहेत वाहने...
लातूर शहरातील अनेक भागांत धान्य खरेदी करणारे महिन्यातून एक ते दोन वेळा फिरतात. गल्लीत फिरून अनेकांना विचारणा करतात. २ ते ३ रुपये किलोप्रमाणे घेतलेले धान्य १० ते १५ रुपये किलोने विक्री होत असल्याने अनेकांना महिन्याला जवळपास १ हजार रुपयांचा नफा होत आहे. काहींच्या घरातील माणसे शिक्षण, रोजगारासाठी बाहेरगावी आहेत, अशा लाभार्थींकडे महिना दोन महिन्यांत क्विंटलभर धान्य जमते. तेवढे खाणे शक्य नसल्याने काळ्या बाजारात विक्री केले जात असल्याचे समोर आले आहे.
गहू १२, तांदूळ १५ रुपये किलो...
पापडी, पशुखाद्य, ब्रेड आदी तयार करण्यासाठी या धान्याचा वापर केला जात आहे. गावोगावी धान्य खरेदी करणारी वाहने फिरत आहेत. शहरी भागातही अनेकजण हे धान्य संकलन करतात, असे सांगण्यात आले. यासंदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी सदाशिव पडदुणे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.