स्वखर्चातून सार्वजनिक ठिकाणी वृक्ष लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:20 IST2021-05-20T04:20:42+5:302021-05-20T04:20:42+5:30
अहमदपूर : तालुक्यातील लांजी येथील रामानंद मुंडे लांजीकर यांनी सव्वा लाखाचा खर्च करून गावातील सार्वजनिक ठिकाणी ६२५ वृक्षांची ...

स्वखर्चातून सार्वजनिक ठिकाणी वृक्ष लागवड
अहमदपूर : तालुक्यातील लांजी येथील रामानंद मुंडे लांजीकर यांनी सव्वा लाखाचा खर्च करून गावातील सार्वजनिक ठिकाणी ६२५ वृक्षांची लागवड केली आहे. बिहार पॅटर्न अंतर्गत संगोपनाची जवाबदारी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. वृक्ष लागवड केलेली रोपे रखरखत्या उन्हाळ्यात वाळू नयेत म्हणून दररोज सकाळी तीन तास ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वृक्षांना पाणी दिले जात आहे.
अहमदपूर तालुक्यातील लांजी येथील सामाजिक कार्यकर्ते रामानंद मुंडे यांनी ऑक्टोबर २०२० मध्ये गावातील भाग क्र. १, जिल्हा परिषद शाळेसमोर, मुख्य रस्ता, विळेगाव जाणारा रस्ता, लांजी गावातील डांबरी रस्त्याच्या दोन्ही बाजूने, भाग क्र. २ मधील सौर उर्जा प्लांटच्या पूर्वेस असलेल्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी अशी एकूण ६२५ रोपांची सार्वजनिक ठिकाणी लागवड केली आहे. त्यापैकी ४०० झाडांना ट्री गार्ड लावण्यात आले आहे.
लागवडीपासून ते आजपर्यंत झाडे जगवण्यासाठी ते स्वतः वृक्षांची सातत्याने पाहणी करतात. रामानंद मुंडे यांचे वृक्ष संगोपनाचे कार्य पाहून गावातील काही नागरिकही
त्यांना सहकार्य करीत आहेत. त्यांना सरपंच रुक्मिणीताई कदम, उपसरपंच कालिदास कदम, संतोष कदम, राजेश चिलकरवर, मनोहर आगलावे, देवदास गायकवाड, सुवर्णाताई कचवे, सत्यभामा मुंडे, गौतम गायकवाड, नागनाथ मुंडे, कैलास आगलावे, विकास पोपतवार, शंकर आगलावे यांनी सहकार्य केले.
त्यांनी लिंब, वड, पिंपळ, अशोक, जांभळ, कदंब, चिंच, नांदुरकी, रानचाफा, सप्तपर्णी, बांबू, पिथोडिया, बेगोनिया, लिंबया अशा रोपांची लागवड केली आहे. सध्या पर्यावरणाचा असमतोल असल्याने हा उपक्रम राबवित आहेत. त्यासाठी गावातील नागरिकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. त्यामुळे गावात वनराई बहरेल.
जूनमध्ये ३ हजार रोपांची लागवड...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लांजी गावात पर्यावरणाचा समतोल ठेवण्यासाठी ऑक्सिजनची निर्मितीसाठी वृक्ष लागवड करीत आहे. गावातील तरुण, नागरिक वेळोवेळी सहकार्य करतात. आतापर्यंत ६२५ वृक्षांची लागवड केली आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मी ऑक्टोबरपासून ६२५ वृक्ष लावले आहेत. त्या झाडांच्या संगोपनाची जबाबदारी ग्रामपंचायतीने स्वीकारली आहे. जूनमध्ये गावात ३ हजार वृक्षांची लागवड करणार आहे, असे रामानंद मुंडे यांनी सांगितले.