वीजपुरवठा तोडल्याने निलंगा अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:19 IST2021-03-19T04:19:20+5:302021-03-19T04:19:20+5:30
निलंगा नगरपालिकेकडे महावितरणचे स्ट्रीट लाईटचे २ कोटी व शहरातील बोअरवेलचे २ कोटी असे एकूण ४ कोटी थकित आहेत. त्यामुळे ...

वीजपुरवठा तोडल्याने निलंगा अंधारात
निलंगा नगरपालिकेकडे महावितरणचे स्ट्रीट लाईटचे २ कोटी व शहरातील बोअरवेलचे २ कोटी असे एकूण ४ कोटी थकित आहेत. त्यामुळे महावितरणचे कार्यकारी अभियंता ढाकणे यांनी वारंवार पालिकेला वीजबिल भरणा करण्यासंबंधी सूचना केल्या. परंतु, वेळेत थकबाकी भरण्यात आली नसल्याने शहरातील पथदिव्यांचा वीजपुरवठा तोडण्यात येईल, अशा सूचनाही केल्या. मात्र पालिका प्रशासनाने वीजबिल भरण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अखेर महावितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गुरुवारी शहरातील स्ट्रीट लाईट व बोअरवेलचा वीजपुरवठा तोडला आहे. परिणामी, शहरात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिकांना चाचपडत फिरावे लागत असल्याचे दिसून येत आहे. वीजपुरवठा तोडण्यात आल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, पालिकेचे मुख्याधिकारी मल्लिकार्जुन पाटील म्हणाले, माकणी येथील पाणीपुरवठ्याचे ५६ लाख रुपये तसेच किल्लारी व निलंगा पाणी पंपाचे २२ लाख रुपये दोन दिवसांपूर्वीच भरले आहेत. त्यामुळे सध्या पालिकेच्या तिजोरीत खडखडाट आहे. अशा परिस्थितीत महावितरणने वीजपुरवठा तोडणे योग्य नाही, असेही ते म्हणाले.
महावितरणच्या कारभारावर संताप...
निलंगा पालिकेकडे गत २० वर्षांची महावितरणची थकबाकी ४.५० कोटी होती. माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या ताब्यात चार वर्षांपूर्वी निलंगा नगर परिषद आली. तेव्हापासून नियमितपणे वीजबिल भरणा केला जात आहे. मागील २० वर्षांपासूनचे थकित ३ कोटी शासनाला भरले आहे. मात्र, शासनाने सर्व नियम बदलून अडचण निर्माण करण्यासाठी पालिकेचे बोअरवेल व स्ट्रीट लाईटचा वीजपुरवठा तोडण्याचे आदेश दिले आहेत. हे अन्यायकारक आहे. सतत ४ वर्षे वीजबिल भरल्यामुळे आजपर्यंत आपला वीजपुरवठा तोडण्यात आला नाही. आघाडी सरकारच्या दीड वर्ष काळात व कोरोना उपाययोजनेसाठी सरकारने पालिकेस एकही रुपया निधी दिला नाही. तरीही खर्च काटकसरीने करून शासकीय देणी ठरलेल्या नियमानुसार भरत आहोत. त्याचबरोबर २४ तास पाणीपुरवठा कनेक्शनसाठी १ कोटी मागील थकबाकी भरून योजना सुरू केली आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही प्रकारची मदत न करता अडचणीत आणणाऱ्या आघाडी सरकारचा व महावितरणचा निषेध
करीत असल्याचे नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे म्हणाले.