नैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्ष कार्यरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:14 IST2021-04-29T04:14:44+5:302021-04-29T04:14:44+5:30
३१२ हेक्टरवर झाली फळबागांची लागवड लातूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार अभियानांतर्गत फळबाग लागवड कार्यक्रम राबविण्यात येत आहे. ...

नैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्ष कार्यरत
३१२ हेक्टरवर झाली फळबागांची लागवड
लातूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार अभियानांतर्गत फळबाग लागवड कार्यक्रम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात ४२४ शेतकऱ्यांनी ३१३ हेक्टरवर फळबागांची लागवड केली आहे. यामध्ये आंबा, पेरू, डाळिंब, मोसंबी, संत्री, सीताफळ, लिंबू, आदी फळांचा समावेश आहे. दरम्यान, या योजनेबाबत कृषी विभागाच्या वतीने जनजागृती केली जात आहे. फळबाग लागवड योजनेमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहनही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
ग्रामीण भागात अँटी कोरोना फोर्सचा पहारा
लातूर : ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अँटी कोरोना फोर्स तयार करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आल्या होत्या. त्यानुसार या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. औसा, निलंगा, देवणी, जळकोट, आदी ठिकाणी स्पर्धा परीक्षा तसेच पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी अँटी कोरोना फोर्समध्ये सहभागी झाले आहेत. या माध्यमातून गावाच्या प्रवेशद्वारावर खडा पहारा दिला जात असून, मास्क, फिजिकल डिस्टन्सिंगबाबत जनजागृती केली जात आहे.
जिल्हाभरात हनुमान जयंती उत्साहात साजरी
लातूर : लातूर शहरासह जिल्ह्यात हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. घरोघरी हनुमान जयंतीनिमित्त पूजन करण्यात आले. तसेच अनेकांनी हनुमान चालिसाचे पठणकेले. कोरोनामुळे अनेकांनी घरच्या घरीच जयंती साजरी करण्याला प्राधान्य दिले. ग्रामीण भागातही नियमांचे पालन करीत हनुमान जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली. या वर्षी जयंतीनिमित्त होणाऱ्या कुस्ती स्पर्धा झाल्या नाहीत.
मोकाट श्वानांमुळे नागरिक त्रस्त
लातूर : शहरातील अनेक भागांत मोकाट श्वानांचा संचार वाढला आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. मोकाट श्वानांमुळे गल्लोगल्लीत भीतीचे वातावरण आहे. याकडे शहर महापालिकेने लक्ष देण्याची मागणी होत आहे. रात्रीच्या वेळी दुचाकीच्या मागे श्वान लागत असल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. मोकाट श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी शहरातील नागरिकांमधून महापालिकेकडे होत आहे.
रस्ता डांबरीकरण करण्याची मागणी
लातूर : लातूर तालुक्यातील जेवळी ते लातूर तसेच हरंगुळ (बु.) या गावाकडे जाणाऱ्या रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारक कमालीचे त्रस्त आहेत. रस्तादुरुस्तीची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात आहे. मात्र त्याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष आहे. या रस्त्याचे तत्काळ डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
लिंगायत महासंघाच्या वतीने सामाजिक उपक्रम
लातूर : लिंगायत महासंघाच्या वतीने कोरोनाग्रस्त रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाइकांसाठी मदत केली जात असल्याची माहिती प्रांताध्यक्ष प्रा. सुदर्शनराव बिरादार यांनी दिली. रुग्णांना बेड मिळणे, औषधासाठी मदत, नातेवाइकांसाठी भोजनाचे डबे, अंत्यविधीसाठी मदत, आदी उपक्रम लिंगायत महासंघाच्या वतीने राबविले जात आहेत. यासाठी जिल्हाध्यक्ष प्रा. काशिनाथ राजे, माणिक कोकणे, विश्वनाथ स्वामी, विजयकुमार कुडंबले, शिवाजी मुळे, दयानंद मठपती, शिवाजी भातमोडे, शंकरे गुरुजी, करिबसवेश्वर पाटील, विश्वनाथ मिटकरी, सिद्राम पोपडे, चंद्रकांत काला-पाटील परिश्रम घेत आहेत.
लातूर तालुक्यात कोरोना नियंत्रण आढावा बैठक
लातूर : लातूर तालुक्यातील गंगापूर, वासनगाव, सावरगाव, एकुर्गा, निवळी या गावांमध्ये उपविभागीय अधिकारी सुनील यादव व तहसीलदार स्वप्निल पवार यांनी भेटी देऊन सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका यांच्या बैठका घेतल्या. तसेच त्यांना मार्गदर्शन केले. कोरोना रुग्ण तसेच होम आयसोलेशनमधील रुग्णांचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी विविध गावांचे सरपंच उपस्थित होते. याप्रसंगी गटविकास अधिकारी शाम गोडभरले, तालुका आरोग्याधिकारी डाॅ. अशोक सारडा, मंडळ अधिकारी संजय घाडगे, आदींसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.