अहमदपुरात अरुंद रस्त्यामुळे पादचाऱ्यांसह वाहनधारकांना मनस्ताप !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:22 IST2021-09-23T04:22:18+5:302021-09-23T04:22:18+5:30
अहमदपूर : शहरातून अंबाजोगाईकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर विटांनी भरलेले ट्रक नेहमीच उभारलेले असतात. तसेच बांधकाम व्यापाऱ्यांनी बांधकामाचे साहित्य ...

अहमदपुरात अरुंद रस्त्यामुळे पादचाऱ्यांसह वाहनधारकांना मनस्ताप !
अहमदपूर : शहरातून अंबाजोगाईकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर विटांनी भरलेले ट्रक नेहमीच उभारलेले असतात. तसेच बांधकाम व्यापाऱ्यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याने रस्ते अरुंद बनले आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांसह वाहनधारकांना वाहने चालविताना मनस्ताप सहन करावा लागत आहे. याकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष होत असून, शहरातील मुख्य रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे.
या मुख्य रस्त्यावर अनेकजण आपल्या दुकानातील साहित्य रस्त्यावर ठेवून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याचबरोबर अंबाजोगाईकडे जाणाऱ्या रस्त्याचे सध्या काम सुरू असल्याने रस्त्यावर दररोज वाहनांच्या रांगा लागत आहेत. या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यात भर म्हणून बांधकामासाठी लागणारे साहित्य व विटांनी भरलेले ट्रक एकाच जागी २४ तास उभारलेले असतात. बांधकाम दुकानदार वाळू, फरशी आदी साहित्य चक्क रस्त्याचा बाजूस ठेवत आहेत. परिणामी, हा मार्ग अरुंद बनला आहे. त्यामुळे पादचाऱ्यांसह वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. शहरात वाढत्या अतिक्रमणांमुळे पादचाऱ्यांना छोट्या वाहनधारकांना ये-जा करणेही कठीण झाले आहे. अतिक्रमणांमुळे मुख्य रस्त्यांच्या तुलनेत गल्लोगल्लीतील रस्ते त्यापेक्षाही मोठे दिसू लागले आहेत. विशेष म्हणजे नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने बऱ्याच वर्षापासून अतिक्रमणे हटविण्यात आले नसल्याने शहरातील रस्त्यावर असे प्रकार दिसून येत आहेत.
शहरातील अंबाजोगाई रोडवर पोलीस ठाणे आहे. या ठाण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अनेक दुकानदारांनी आपले साहित्य रस्त्यावर ठेवल्याने या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली आहे.
शहरातील नारायण मंदिरापर्यंत बांधकामाचे साहित्य रस्त्यावर पडलेले आहे. हा मार्ग औरंगाबाद, पुणे, मुंबई, अहमदनगर, अंबाजोगाई या मोठ्या शहरांना जोडणारा आहे. त्यामुळे वाहनांची संख्या जास्त असते. त्यामुळे पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. याकडे नगरपरिषदेने लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
ऑटो चालकांची बेशिस्त वाढली...
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा बश्वेश्वर चौक, महात्मा गांधी कॉलेज रोड, थोडगा रोड, आझाद चौक, हिना लॉज चौक, सावरकर चौक मुख्य चौक आहेत. त्यामुळे येथे सतत पादचाऱ्यांसह वाहनधारकांची मोठी वर्दळ असते. चौकचौकांत भाजीविक्रेते, फळविक्रेते, हातगाडेही थांबविण्यात येत आहेत. त्यामुळे शहरातील वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर येत आहे. दरम्यान, अनेक ऑटोचालक प्रवासी मिळविण्यासाठी कुठेही थांबत असल्याने वाहतुकीची समस्या निर्माण होत आहे.
अतिक्रमणाकडे लक्ष देण्याची गरज...
अहमदपूर शहरात अतिक्रमणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अहमदपूर-अंबाजोगाई रोडवर तसेच नांदेड-लातूर रोडवर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असते. या रस्त्यावर दुतर्फा अतिक्रमण झाल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या अतिक्रमणाचा पादचाऱ्यांना, वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी डॉ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी, राजकुमार तत्तापुरे यांनी केली आहे.