स्टेट बँकेच्या सुविधांअभावी औरादमध्ये लाखोंचे व्यवहार ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:25 IST2021-02-17T04:25:33+5:302021-02-17T04:25:33+5:30
लातूर जिल्ह्यातील तिसर्या क्रमांकाची बाजारपेठ असलेल्या येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतकऱ्यांचे शेतीमालाचे व्यवहार येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ...

स्टेट बँकेच्या सुविधांअभावी औरादमध्ये लाखोंचे व्यवहार ठप्प
लातूर जिल्ह्यातील तिसर्या क्रमांकाची बाजारपेठ असलेल्या येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतकऱ्यांचे शेतीमालाचे व्यवहार येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत आहेत. मात्र, याठिकाणी वेळेत कामे होत नसल्याने व्यापार्यांसह शेतकरीही अडचणीत सापडले आहे. परिणामी लाखोंचे व्यवहार ठप्प झाले आहेत.
शेतकरी, आडत व्यापारी, शहरातील अन्य व्यापारी यांचे व्यवहार याच शाखेत आहेत. शिवाय सदर बाजार पेठेत महाराष्ट्र कर्नाटकातील ५० ते ८० गावांचा शेतीमाल विक्रीसाठी येतो. सोबतच इतर बाजारपेठ, कपडा, जनरल, किराणा, मेडिकल, पेट्रोल पंप सह आदी व्यापाऱ्यांच्या आर्थिक व्यवहार खाती याच बँकेत असल्याने दररोज पैसे भरणे काढणे सुरूच असते. शिवाय, एनएफटी, आरटीजीएस चे व्यवहार याच बँकेत केली जातात. सदर बँकेत व्यापाऱ्यांची शेतकऱ्यांना देणे असलेली पेमेंट आरटीजीएस मार्फत केली जातात पण संबंधित बँकेतील कर्मचारी हा सदर नेफ्ट आरटीजीएस व चेक ट्रान्सफर चार ते पाच दिवस न करता तसेच ठेवत असल्याने आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे बाजारपेठेत येणारा कृषिमाल हा इतरत्र वळला जात आहे. परिणामी हमाल व मापाडी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली तर ऐन लग्नसराईत व्यवहारासाठी शेतीमाल घालून शेतकऱ्यांना पैसे मिळत नसल्याने शेतकऱ्यांची अडवणूक होत आहे. यासंबंधी मंगळवारी येथील आडत व्यापारी असोसिएशनने व इतर व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन बँकेत शाखा व्यवस्थापक यांना मागणीचे निवेदन दिले आहे. यावेळी पूनम राठी, विष्णुदास सोमानी, राजअप्पा वलांडे, विनोद सोनी, अशोक थेटे, शिवपुत्र धबाले, स्वप्नील देवणे, चन्नबस तडाेळगे आदी व्यापारी उपस्थित होते.
वरिष्ठांना माहिती दिली- शाखा व्यवस्थापक
दरम्यान शाखा व्यवस्थापक हरीश तांबे यांच्याशी संपर्क केला असता, ते म्हणाले की संबंधित अधिकारी हा त्यांची नेफ्ट व आरटीजीएस ट्रान्सफरची कामे न करता वेळ घालवतो. ग्राहकांना उध्दट वागतो अशा तक्रारी ग्राहकांच्या आहेत. याची माहिती वरिष्ठांना कळवली आहे. सर्व व्यापारी यांना लवकरच चांगल्या सुविधा बँकेकडून पुरवल्या जातील, असे आश्वासन त्यांनी व्यापारी शिष्टमंडळाला दिले.
याविषयी बँकेचे विभागीय सहाय्यक महाव्यवस्थापक नंदकिशोर भोसले यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले की या विषयीची अद्याप तक्रार झालेली नाही तक्रार आल्यानंतर चौकशीअंती कारवाई करण्यात येईल असे ते म्हणाले