मुख्य जलवाहिनीच्या व्हॉल्वला गळती, चाकुरला अशुध्द पाणीपुरवठा सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:14 IST2021-04-29T04:14:57+5:302021-04-29T04:14:57+5:30
चाकूर : शहराला पाणीपुरवठा करणा-या मुख्य जलवाहिनीवरील व्हॉल्वला लिकेज असल्याने त्यात गटारीचे घाण पाणी जात आहे. परिणामी, शहरास अशुध्द ...

मुख्य जलवाहिनीच्या व्हॉल्वला गळती, चाकुरला अशुध्द पाणीपुरवठा सुरु
चाकूर : शहराला पाणीपुरवठा करणा-या मुख्य जलवाहिनीवरील व्हॉल्वला लिकेज असल्याने त्यात गटारीचे घाण पाणी जात आहे. परिणामी, शहरास अशुध्द पाणीपुरवठा होत आहे. ही समस्या नगरपंचायतीच्या निदर्शनास आणून देऊनही दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे रोगराई वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सध्या कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे प्रत्येकाला धास्ती वाढली आहे. अशा परिस्थितीत चाकुरात नवीन समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. चाकूर शहराला बोथी येथील पाझर तलावातून पाणी पुरवठा होतो. त्यासाठी बोथी ते चाकूर अशी मुख्य जलवाहिनी आहे. त्यावर अनेक ठिकाणी व्हॉल्व बसविण्यात आले आहेत. त्यापैकी काही ठिकाणच्या व्हॉल्वला गळती लागली आहे. त्यातून पाण्याची नासाडी होत आहे. परंतु शहरानजिक असलेल्या एका व्हॉल्वला अधिक गळती असून ज्यावेळी पाणीपुरवठा होत असतो, तेव्हा त्या व्हॉल्वमधून पाण्याचे फवारे उडून पाण्याची नासाडी होते.
जेव्हा पाणीपुरवठा बंद होतो, तेव्हा या व्हॉल्वमध्ये बाजूस असलेल्या गटारीतील पाणी जाते. पाणीपुरवठा सुरु झाल्यानंतर ते पुढे पाण्याच्या टाकीतून अशुध्द पाणी जाते. त्यानंतर जलकुंभातून शहरातील नागरिकांना जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा होतो. पाण्याच्या टाक्याही अस्वच्छ आहेत. टाकीत उतरण्यासाठी असलेली लोखंडी सिडी कुजली आहे. नगरपंचायतीच्या दुर्लक्षामुळे शहरवासियांना अशुध्द पाणी प्यावे लागत आहे. त्यातून विविध आजार पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.
ही समस्या अनेकदा संबंधित पाणीपुरवठा विभागाच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे. मनसेने मुख्याधिका-यांना घेऊन स्पॉट पंचनामाही केला होता. तेव्हा मुख्याधिका-यांनी आठ दिवसांत या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्यापही दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
मनसेकडून स्पॉट पंचनामा...
चाकुरातील अशुध्द पाणीपुरवठ्याच्या समस्येबाबत स्पॉट पंचनामा करुन आंदोलनही केले होते. तेव्हा ही समस्या लवकरच सोडविण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. परंतु, अद्यापही दुरुस्ती करण्यात आली नाही. ही समस्या सोडवावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाणे यांनी केली आहे.
संबंधितावर कार्यवाही करावी...
अशुध्द पाण्यामुळे रोगराई पसरण्याची भीती आहे. नगरपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. संबंधित अधिका-यांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी लक्ष्मण धोंडगे यांनी केली.
अधिका-यांना बाटली बंद पाणी...
शासकीय अधिकारी कार्यालयात बाटली बंद पाणी पितात. त्यामुळे त्यांना जनतेच्या पाणी प्रश्नाचे काही देणे- घेणे नाही. या गंभीर समस्यांकडे दुर्लक्ष करणा-यांवर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी अल्ताभ हरणमारे यांनी केली.
लवकरच दुरुस्ती...
मुख्य जलवाहिनीवरील व्हॉल्वची लवकरच दुरुस्ती करण्यात येईल. त्यासंबंधी संबंधित अधिकारी व कर्मचा-यांना सूचना केल्या जातील, असे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांनी सांगितले.