भेसळ रोखण्यासाठी मिठाई विक्रेत्यांवर करडी नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:25 IST2021-09-09T04:25:20+5:302021-09-09T04:25:20+5:30
गौरी-गणपतीसह अन्य सणानिमित्ताने बाजारपेठेत मिठाईसह अन्य अन्न पदार्थांना मोठी मागणी असते. विशेषत: दूध व दुग्धजन्य पदार्थांपासूनच्या पदार्थांना ग्राहकांची पसंती ...

भेसळ रोखण्यासाठी मिठाई विक्रेत्यांवर करडी नजर
गौरी-गणपतीसह अन्य सणानिमित्ताने बाजारपेठेत मिठाईसह अन्य अन्न पदार्थांना मोठी मागणी असते. विशेषत: दूध व दुग्धजन्य पदार्थांपासूनच्या पदार्थांना ग्राहकांची पसंती असते. अशा परिस्थितीत भेसळयुक्त पदार्थ विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातून ग्राहकांची फसवणूक होऊ शकते. अशा प्रकारचे भेसळयुक्त अन्नपदार्थ विक्री होऊ नये, म्हणून अन्न व औषध प्रशासन विभाग सतर्क झाला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक मिठाई दुकानांवर करडी नजर ठेवली आहे.
विक्रेत्यांनी मिठाईत कोणत्याही प्रकारचा अखाद्य रंग, कृत्रिमरीत्या गोडी आणणाऱ्या पदार्थांचा वापर करू नये. शिळी, बुरशी आलेल्या मिठाईची विक्री करू नये, अशा सूचना अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त द.वि. पाटील यांनी करून ते म्हणाले, अन्नपदार्थ व्यावसायिकांनी पदार्थांची विक्री करण्यासाठी परवाना घेणे आवश्यक आहे. विनापरवाना अन्नपदार्थ विक्री होत असल्याचे आढळून आल्यास अथवा कुठलीही तक्रार आल्यास तत्काळ कार्यवाही करण्यात येईल.
दिशाभूल केल्यास कार्यवाही...
अन्न पदार्थ विक्रेत्यांनी ग्राहकांची दिशाभूल करु नये, अन्यथा कार्यवाही करण्यात येईल. मिठाई पॉकेटवर उत्पादकाचा पत्ता, मिठाईचे नाव, उत्पादन दिनांक, त्याचा वापर करण्यापर्यंत दिनांक, तसेच साठवणुकीबाबतची माहिती स्पष्ट देणे गरजेचे आहे. यात कसूर झाल्याचे आढळून आल्यास कार्यवाही केली जाईल.
- द.वि. पाटील, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन.