कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी भालकीच्या हिरेमठ संस्थानचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:20 IST2021-05-12T04:20:05+5:302021-05-12T04:20:05+5:30
बिदर जिल्ह्यातील भालकी हिरेमठ संस्थानचे डॉ. बसवलिंग पट्टदेवरू महास्वामीजी यांनी महाराष्ट्र बसव परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात महात्मा बसवण्णा आणि ...

कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी भालकीच्या हिरेमठ संस्थानचा पुढाकार
बिदर जिल्ह्यातील भालकी हिरेमठ संस्थानचे डॉ. बसवलिंग पट्टदेवरू महास्वामीजी यांनी महाराष्ट्र बसव परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात महात्मा बसवण्णा आणि लिंगायत धर्म साहित्य प्रकाशित करण्याचे ऐतिहासिक कार्य मोठ्या प्रमाणात केले आहे. तसेच ते सुरूही आहे. याशिवाय त्यांनी आजवर अनेक अनाथ मुलांचे संगोपन केले आहे. गरीब व होतकरू मुलांना विनामूल्य शिक्षण, निवास व भोजनाची व्यवस्था केली असून, हजारो मुलांचे जीवन फुलविले आहे.
याविषयी प्रसिद्धी पत्रकात स्वामीजींनी म्हटले आहे की, देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. सर्वत्र भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. दररोज शेकडो रुग्ण मृत्युमुखी पडत आहेत. कामगार, शेतमजूर, कष्टकरी आणि छोट्या-मोठ्या व्यवसायांवर अवलंबून असलेले लाखो कुटुंबे हवालदिल झाली आहेत. योग्यवेळी उपचार न मिळाल्याने काही घरांतील कर्त्या आई- वडिलांचे निधन झाले आहे. अशा मुलांचे भविष्य अंधकारमय होऊ नये म्हणून अशा मुलांचे पूर्णत: संगोपन करण्याची जबाबदारी भालकी हिरेमठ संस्थानचे डॉ. बसवलिंग पट्टदेवरू महास्वामी स्वीकारणार आहेत. अधिक माहितीसाठी भालकी मठाचे नूतन मठाधिपती श्री गुरुबसव पट्टदेवरू स्वामीजी, मठाचे व्यवस्थापक मोहन रेड्डी आणि महाराष्ट्र बसव परिषदेचे संचालक राजू जुबरे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
हजारो मुलांचे जीवन फुलविले...
भालकीच्या हिरेमठ संस्थानने आजपर्यंत हजारो अनाथ मुलांचा सांभाळ करून त्यांना शिक्षण दिले आहे. त्यामुळे त्यांचे जीवन फुलले आहे. सध्याचे कोरोनाचे संकट मोठे आहे. अशा परिस्थितीत आधाराची गरज आहे. त्यामुळे हा उपक्रम अधिक व्यापक पद्धतीने राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.