परिपूर्ण तयारी केल्यास स्पर्धा परीक्षेत यश मिळतेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:18 AM2021-04-13T04:18:19+5:302021-04-13T04:18:19+5:30
लातूर : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. स्पर्धा परीक्षा हा एकमेव पर्याय समजून मेहनतीने तयारी केल्यास ...
लातूर : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. स्पर्धा परीक्षा हा एकमेव पर्याय समजून मेहनतीने तयारी केल्यास यश नक्कीच मिळते, असे प्रतिपादन कोल्हापूर येथील अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी येथे केले.
राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या बी. ए. स्पर्धा परीक्षा विभागाच्या वतीने आयोजित ऑनलाइन व्याख्यानमालेत ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे यांची प्रमुख उपस्थिती होती. तिरुपती काकडे म्हणाले, स्पर्धा परीक्षेतील यशासाठी आपले प्रयत्न नियोजित व योग्य दिशेने असायला हवेत. आपण पाहिलेली स्वप्ने जशी मोठी आहेत त्याच पद्धतीने आपले प्रयत्न आणि मेहनत जास्त करायला हवी. अभ्यास करताना उत्तम दर्जाच्या पुस्तकांचा अवलंब करावा. वाचन करताना संकल्पना समजून घ्याव्यात. वाचन, लेखन, सराव या माध्यमातून अध्ययन करावे. अभ्यासाबरोबर आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी आपला छंद जोपासावा. योगा, मेडिटेशन, व्यायाम नियमित करावा. अपयश आले तरी नकारात्मक दृष्टिकोन न बाळगता विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावेत, असेही कोल्हापूर येथील अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे म्हणाले. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे यांनी महाविद्यालयातील विविध उपक्रमांची माहिती दिली. प्रास्ताविक प्रा. माधव शेळके यांनी केले, तर आभार प्रा. नितीन पांचाळ यांनी मानले. ऑनलाइन कार्यक्रमास विद्यार्थी, प्राध्यापकांची उपस्थिती होती.