लातूर : शिवसेना आणि मनसे एकत्र यावे, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. त्यासंदर्भात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुखराज ठाकरे हेच निर्णय घेतील. दोन्ही बंधू एकत्र आल्यास महाराष्ट्रातील चित्र पालटेल, असे मत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी बुधवारी पत्रपरिषदेत व्यक्त केले. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी करत असल्याचेही खैरे म्हणाले.
लातूर शहरात बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत खैरे बाेलत होते. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते म्हणाले, शिवसेना स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी करीत आहे. दरम्यान, महाविकास आघाडी झाल्यास पक्ष प्रमुखांच्या आदेशावरून एकत्र निवडणूक लढवू. राज्यातील महायुती सरकार केवळ आश्वासने देणारे आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचे जाहीर केले होते. मात्र, खात्यावर तेवढी रक्कम जमा केली नाही. महायुतीत तीन गट पडले असून, त्यांच्यातील अंतर्गत वाद विकोपाला जात आहेत, असेही ते म्हणाले. यावेळी शिवसेना उपनेते शरद कोळी, शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी, बालाजी रेड्डी, सहसंपर्कप्रमुख नामदेव चाळक, जयश्रीताई उटगे, सुनीताताई चाळक आदी उपस्थित होते.