हैदराबाद मुक्ती लढा धगधगत्या व्यक्तिमत्त्वांची मालिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:25 IST2021-09-17T04:25:04+5:302021-09-17T04:25:04+5:30
लातूर : हैदराबाद मुक्ती लढ्यातील सर्वच स्वातंत्र्यसेनानी म्हणजे धगधगत्या व्यक्तिमत्त्वांची मालिकाच होती. मूळचे उदगीर येथील असलेले हणमंतराव केशव बेंडे ...

हैदराबाद मुक्ती लढा धगधगत्या व्यक्तिमत्त्वांची मालिका
लातूर : हैदराबाद मुक्ती लढ्यातील सर्वच स्वातंत्र्यसेनानी म्हणजे धगधगत्या व्यक्तिमत्त्वांची मालिकाच होती. मूळचे उदगीर येथील असलेले हणमंतराव केशव बेंडे यांची शौर्य कथाही अशीच प्रेरणादायी आहे. निजाम राजवटीतील पोलिसांचा अतोनात छळ सहन करून न डगमगता स्वातंत्र्यासाठी त्यांनी दिलेल्या लढ्याची कथा आजही अंगावर शहारे आणणारी आहे. गुलामगिरीच्या जोखडातून सुटका करण्यासाठी अनेकांनी योगदान दिले. छळ सहन केला. यापैकीच एक नाव म्हणजे स्वातंत्र्यसेनानी हणमंतराव केशवराव बेंडे, मूळचे उदगीरचे. शालेय शिक्षणासाठी ते अंबाजोगाईला गेले. हैदराबाद मुक्ती लढ्याचे अंबाजोगाई माहेरघर. स्वामी रामानंद तीर्थ, बाबासाहेब परांजपे असे थोर व्यक्तिमत्त्व ज्ञानदानाचे कार्य करीत असतानाच स्वातंत्र्याचा लढा लढत होते. शिक्षण घेत असताना या लढ्यात बेंडे यांनी स्वत:ला झोकून दिले. नववीच्या वर्गात शिकत असतानाच स्वातंत्र्याच्या आंदोलनात सहभागी झाले. यामुळे त्यांना नऊ महिन्यांची शिक्षा झाली. ४२ च्या आंदोलनातही त्यांनी सहभाग नोंदविला. १९४७-४८ च्या लढ्यात त्यांनी झेप घेतली. लातूर जिल्ह्यातील डोंगरगाव येथे सत्याग्रह होणार असल्याची खबर पोलिसांना लागली. या सत्याग्रहात स्वातंत्र्यसेनानी बेंडे होते. त्यांना पोलिसांनी अटक करण्यासाठी व्यूहरचना आखली होती. मात्र पोलिसांचा पहारा चुकवून पूर आलेल्या दुधना नदीतून पसार झाले. जालना मार्गे देऊळगाव राजाला पोहोचले. देऊळगाव येथील शिबिरात सहभाग नोंदवून हैदराबाद लढ्यात पुन्हा जोमाने उतरले. कोरोडगिरी येथे झालेल्या आंदोलनात मोठी भूमिका निभावली. पटवाऱ्याचे दप्तर जाळून मालगुजारीची रक्कम हिसकावून आणली. परत देऊळगावकडे शिबिरात येताना पोलिसांनी त्यांना पकडले. यावेळी पोलिसांकडून खूप छळ झाला. मात्र या छळाला न जुमानता हैदराबाद मुक्ती लढा त्यांनी यशस्वी केला. हैदराबाद मुक्ती लढ्यातील हणमंतराव बेंडे पेटत्या मशालीप्रमाणे धगधगते व्यक्तिमत्त्व होते. १९४९ नंतर मात्र त्यांनी निती निकेतन शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून सेवा वृत्तीने काम करून आगळेवेगळे स्थान निर्माण केले. असे हे व्यक्तिमत्त्व १६ डिसेंबर २००५ रोजी वयाच्या ८३ व्या वर्षी अनंतात विलीन झाले.