जिल्ह्यातील पोलीस, आरोग्य कर्मचाऱ्यांचा मानसिक थकवा कसा घालविणार; उपाययोजनांची आवश्यकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:19 AM2021-05-13T04:19:15+5:302021-05-13T04:19:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : कोरोनामुळे सतत कामाच्या तणावात असलेल्या पोलीस आरोग्य विभागातील फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांचा मानसिक थकवा वाढतच आहे. ...

How to alleviate the mental fatigue of police and health workers in the district; The need for measures | जिल्ह्यातील पोलीस, आरोग्य कर्मचाऱ्यांचा मानसिक थकवा कसा घालविणार; उपाययोजनांची आवश्यकता

जिल्ह्यातील पोलीस, आरोग्य कर्मचाऱ्यांचा मानसिक थकवा कसा घालविणार; उपाययोजनांची आवश्यकता

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

लातूर : कोरोनामुळे सतत कामाच्या तणावात असलेल्या पोलीस आरोग्य विभागातील फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांचा मानसिक थकवा वाढतच आहे. हा थकवा कमी करण्यासाठी ना सुटी मिळतेय, ना कुटुबीयांसाठी पुरेसा वेळ देता येतोय. त्यामुळे मानसिक थकवा घालविण्यासाठी स्थानिक प्रशासनाने उपाययोजना राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.

लातूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णांवर उपचार करण्यासाठी कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांना सुटी मिळणे कठीण झाले आहे. तर संचारबंदीत सतत रस्त्यावर कार्यरत राहून गर्दी कमी करण्यासाठी पोलिसांचाही बंदोबस्त कालावधी वाढला आहे. अशा स्थितीत मागील एक ते दीड वर्षांपासून हे कर्मचारी आणि अधिकारी कार्यरत आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होण्याचा धोका वाढला आहे. सेवा प्रथम, या ध्येयाने पोलीस आणि आरोग्य कर्मचारी आपली सेवा बजावीत आहेत; मात्र कोरोनामुळे कामाचे तास आणि ताण वाढला असल्याने मानसिक थकवा दूर करण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी प्रशासनाने उपाययोजना राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.

संचारबंदीमुळे पोलीस दिवस-रात्र कार्यरत आहेत. मागील काही दिवसांपूर्वी पोलीस अधिकारी, कर्मचारी कोरोना पाॅझिटिव्ह आले होते. त्यामुळे सामाजिक संस्थांच्या मदतीने हेल्पलाइनची सुविधा सुरू करण्यात आली होती. त्याद्वारे बाधित कर्मचाऱ्यांशी संवाद साधला जात होता. नवीन उपक्रम राबविण्याचा मानस आहे. - निखिल पिंगळे, पोलीस अधीक्षक

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून आरोग्य कर्मचारी सेवा बजावत आहेत. सध्या रुग्णसंख्या वाढत असल्याने कामाचा व्यापही वाढला आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांचे मानसिक स्वास्थ्य निरोगी राहावे, ताण-तणाव कमी व्हावा, यासाठी विपश्यनाचा पर्याय देण्यात आला आहे. त्यानुसार आरोग्य विभाग अंमलबजावणी करीत आहे.

- डाॅ. गंगाधर परगे, जिल्हा आरोग्याधिकारी

आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी विपश्यनाबाबत निर्णय झाला आहे; मात्र त्याची अंमलबजावणी लवकर होणे गरजेचे आहे. कामाचा वेळ वाढला असल्याने थोडा थकवा आहे. उपाययोजना करणे गरजेचे आहे.

- आरोग्य कर्मचारी

आम्ही सुरक्षित राहिलो तर आमचे कुटुंब सुरक्षित राहील. कामाचा ताण सहन करावा लागत असून, वेळही वाढविण्यात आला आहे. कमी कर्मचारी असताना अतिरिक्त कामाचा ताण वाढत आहे. त्यामुळे मानसिक थकवा दूर करण्याची गरज आहे. - आरोग्य कर्मचारी

संचारबंदीमुळे बंदोबस्तावर तैनात राहावे लागत आहे. काम आणि बंदोबस्तामुळे कुटुंबीयांना वेळही देणे अवघड झाले आहे. योगासने, प्राणायाम, मन शांत राहण्यासाठी वेगवेगळी शिबिरे घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

- पोलीस कर्मचारी

कामाचा ताण वाढल्याने किमान साप्ताहिक सुटी मिळणे गरजेचे आहे. तणावमुक्त राहण्यासाठी उपाययोजना राबविण्याची गरज आहे. साप्ताहिक सुटी मिळाल्यास कुटुंबीयांसाठी वेळ देता येईल. योगा, प्राणायामचे वर्ग घेण्याची आवश्यकता आहे. - पोलीस कर्मचारी

Web Title: How to alleviate the mental fatigue of police and health workers in the district; The need for measures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.