सर्वेक्षण साहित्यासाठी ग्रामपंचायतीकडून ‘आशां’ना ठेंगा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:20 IST2021-05-12T04:20:14+5:302021-05-12T04:20:14+5:30
लातूर : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. गावस्तरावर सर्दी, खोकला, ताप आदी आजाराची लक्षणे ...

सर्वेक्षण साहित्यासाठी ग्रामपंचायतीकडून ‘आशां’ना ठेंगा!
लातूर : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. गावस्तरावर सर्दी, खोकला, ताप आदी आजाराची लक्षणे असणाऱ्यांचा सर्व्हे करून हे रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रात रेफर करावेत, यासाठी आशा स्वयंसेविकांकडून सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. या सर्वेक्षणासाठी मास्क, सॅनिटायझर, हँडग्लोव्हज, गरजेनुसार पीपीई कीट व इतर साहित्य ग्रामपंचायतींनी द्यावे, असे आदेश असतानाही निधी नसल्याची बाब पुढे करून टाळाटाळ केली जात असल्याचे सांगण्यात येत आहे.
ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या मागील काही दिवसांपासून वाढलेली आहे. गावस्तरावर सर्वेक्षण करण्याची जबाबदारी आशा स्वयंसेविकांकडे सोपविण्यात आली आहे. दररोज घरोघरी जाऊन आजाराची लक्षणे असलेल्यांचा शोध घेऊन त्यांना रुग्णालयात रेफर करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आहेत. मात्र हे काम करीत असताना आशांच्या सुरक्षेसाठी लागणारे साहित्य कोण देणार? असा सवाल होता. यावर जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी सर्व गटविकास अधिकाऱ्यांना आदेश काढून पंधराव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतस्तरावर आशा वर्कर्संना हँडग्लोव्हज, सॅनिटायझर, पीपीई कीटची उपलब्धता करून देण्यात यावी, असे आदेश काढले. याची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी, अशी सूचना देऊन पंधरा दिवस उलटले तरी अद्याप अनेक ग्रामपंचायतींनी साहित्य दिलेले नाही. त्यामुळे सर्वेक्षणात अडथळा निर्माण झाला आहे. सुरक्षा कीटविनाच अनेकजण घरोघरी जाऊन सर्वे करीत आहेत. यासाठी मिळणारा मोबदला अत्यंत तुटपुंजा असतानाही जीव धोक्यात घालून आम्ही काम करीत असतानाही किमान साहित्य तरी ग्रामपंचायतींनी द्यावे, अशी मागणी आशा स्वयंसेविकांकडून होत आहे.
आमच्याही सुरक्षेचा विचार व्हावा
घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याचे काम सुरू आहे. यासाठी मास्क, हँडग्लोव्हज, सॅनिटायझर आवश्यक आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आम्हाला आवश्यक ती साधने उपलब्ध करून दिल्यास सर्व्हे करीत असताना मनात भीती राहणार नाही. प्रशासनाने आदेश दिलेले असतानाही ग्रामपंचायत निधी नसल्याचे सांगून टाळाटाळ करीत आहे. आमच्याही सुरक्षेचा विचार होणे गरजेचे आहे.
- आशा स्वयंसेविका