जळकोटात मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांतून समाधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:24 IST2021-09-05T04:24:21+5:302021-09-05T04:24:21+5:30
जळकोट तालुक्यात यंदा जूनपासून चांगले पर्जन्यमान झाले आहे. मात्र, मध्यंतरीच्या कालावधीत २५ दिवसाची उघडीप दिली होती. परिणामी, मूग, उडीद ...

जळकोटात मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांतून समाधान
जळकोट तालुक्यात यंदा जूनपासून चांगले पर्जन्यमान झाले आहे. मात्र, मध्यंतरीच्या कालावधीत २५ दिवसाची उघडीप दिली होती. परिणामी, मूग, उडीद व सोयाबीनच्या उत्पादनात घट झाली आहे. दरम्यान, गत आठवड्यापासून सतत पाऊस होत आहे. शनिवारी दुपारी तासभर मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे रस्त्यावरून पाणी वाहत होते. जळकोट महसूल मंडळात आतापर्यंत ७७३ मिमी तर घोणसी मंडळात ६०३ मिमी पाऊस झाला आहे.
गेल्या आठवडाभरापासून सतत होत असलेल्या पावसामुळे पाझर, साठवण तलावातील जलसाठा वाढला आहे. नदी-नाले वाहू लागले आहेत. तालुक्यातील काही तलाव ओसंडू लागले आहेत. या पावसामुळे ज्वारी, तूर, कापूस, सूर्यफुल आदी पिकांना लाभ झाला आहे. या पावसाचा फायदा रबी हंगामासाठी पिकांना होण्याची आशा आहे. जळकोट शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या माळहिप्परगा येथील प्रकल्पात ९० टक्के जलसाठा झाला आहे. याशिवाय, ढोरसांगवी व परिसरातील साठवण तलावात जलसाठा वाढत आहे.