जळकोट तालुक्यात मुसळधार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:25 IST2021-09-08T04:25:45+5:302021-09-08T04:25:45+5:30
आजपर्यंत जळकोट मंडळात ८४७ मिमी. घेाणसी मंडळात ६७९ मिमी पाऊस सोमवारच्या रात्रीपर्यंत झाल्याची नोंद झाली. सरासरी तालुक्यात ७६३ मि.मी. ...

जळकोट तालुक्यात मुसळधार पाऊस
आजपर्यंत जळकोट मंडळात ८४७ मिमी. घेाणसी मंडळात ६७९ मिमी पाऊस सोमवारच्या रात्रीपर्यंत झाल्याची नोंद झाली. सरासरी तालुक्यात ७६३ मि.मी. पाऊस झाल्याची नोंद झाली आहे.
तालुक्यातील हळद वाढवणा, रावणकोळा या गावचे साठवण तलाव व पाझर तलाव काठोकाठ भरल्याने नद्यांना पूर येऊन जळकोट, रावणकोळा मार्ग बंद झाला आहे. तालुक्यातील १२ साठवण तलाव सोनवळा, करंजी, चेरा-१, चेरा-२, डोंगरगाव, ढोरसांगवी, जंगमवाडी, गुत्ती, माळहिप्परगा, हळदवाढवणा, रावणकोळा, जिरगा सर्व साठवून तलावे व पाझर तलाव हे ओव्हरफ्लो झाले असल्याने त्या खालील नदीला पूर आला आहे. पाण्यामुळे नदीकाठच्या, नाल्या काठच्या जमिनी खचून गेल्याने शेतीचे नुकसान झाले आहे. वस्तीत व शेतीमध्ये पाणी घुसून पिकांचे नुकसान झाले आहे. सोयाबीन व उसाचे अतोनात नुकसान झाले आहे.
जळकोट येथील जांब रस्त्यावरील पाझर तलाव शंभर टक्के भरल्याने व पाणी जास्त कोंडल्याने तळ्याखालील शेतकऱ्यांनी प्रशासनाला सूचना देऊन तेथील तळ्याचा सांडवा फोडून पाण्याला वाट करून दिली आहे. यावेळी तलाठी युवराज करेप्पा उपस्थित होते. कुणकी वरून जाणारा धामणगाव, जिरगा, डोमगाव रस्ता नदीला पूर आल्याने बंद झाला आहे. नगदी हाताला आलेले सोयाबीन जमीनदोस्त झाले आहे. या नुकसान भरपाईचा तत्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी व पीक विमा लागू करावा, अशीही मागणी शेतकऱ्यांकडून जोर धरत आहे.
अतरनूरमध्ये शिरले घरात पाणी...
अतनूर : पावसाच्या पाण्यामुळे अतनूर तिरू येथील नदीला पूर आला असून तिरू नदीवरील अतनूर गावालगत असलेल्या ३५ वर्षांनंतरचा जीर्ण झालेल्या पुलावरून पाणी तुडुंब भरून वाहत असल्याने दळणवळण व वाहतूक व्यवस्था ठप्प असून राज्य मार्ग संपूर्णत: बंद आहे. तसेच अतनूर गावातील नाली, रस्त्यावर कंबरे एवढे पाणी वाहत असल्याने व पाणी जाण्यासाठी पर्यायी नाली व सिमेंट रस्ते नसल्यामुळे घराघरात पाणी घुसून मोठ्या प्रमाणात जीवनावश्यक वस्तूंचे, अन्न धान्ये, कपडे-लते सह इत्तर वस्तूची नासाडी झाली आहे. अतनूर तिरू नदीला महापूर आल्याने अतनूर, गव्हाण, मेवापूर, चिंचोली, मरसांगवी, सुल्लाळी, डोंगरगाव, तिरूका, बेळसांगवी गावालगत व तिरू नदी लगतच्या जमीन व शेतजमिनीवरील खरीप पिके जोरदार अतिवृष्टीने संपूर्णत: खरडून गेली आहेत.