वादळी वाऱ्यासह कारेपुरात गारपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:18 AM2021-04-12T04:18:15+5:302021-04-12T04:18:15+5:30
दोन दिवसांपासून जिल्ह्यातील वातावरणात बदल झाला आहे. रविवारी ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. रेणापूर तालुक्यातील कारेपूर व आनंदवाडी परिसरात ...
दोन दिवसांपासून जिल्ह्यातील वातावरणात बदल झाला आहे. रविवारी ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. रेणापूर तालुक्यातील कारेपूर व आनंदवाडी परिसरात दुपारी ३.३० ते ४ वाजेच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. कारेपूर येथे गारपीट झाली. वादळी वाऱ्यायामुळे काहींच्या घरांवरील पत्रे उडून गेली. तसेच भाजीपाला व फळबागांसह गव्हाचे नुकसान झाले आहे. तसेच आंब्याच्या कैऱ्या गळून पडल्या आहेत.
वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने त्याचे तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी या भागातील नागरिक व शेतकरी करीत आहेत. दरम्यान, कारेपूर व परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्यामुळे नुकसान झाल्याची माहिती मिळताच आ. धीरज देशमुख यांनी प्रशासनास तात्काळ पंचनामे करून अहवाल सादर करावा, असे आदेश दिले आहेत.
फोटो कॅप्शन : रेणापूर तालुक्यातील कारेपूर परिसरात रविवारी दुपारी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने झाडे उन्मळून पडली. तसेच भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे.