किल्लारीवाडी येथील भूकंपग्रस्त नागरिकांच्या अन्नत्याग आंदोलनाचा चौदावा दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:24 IST2021-09-15T04:24:36+5:302021-09-15T04:24:36+5:30
किल्लारी व किल्लारीवाडी येथील भूकंपग्रस्त आपल्या न्याय हक्कासाठी १९९५-९६ पासून सनदशीर मार्गाने मागणी करीत आहेत. शासनाकडून लेखी आश्वासने मिळाले ...

किल्लारीवाडी येथील भूकंपग्रस्त नागरिकांच्या अन्नत्याग आंदोलनाचा चौदावा दिवस
किल्लारी व किल्लारीवाडी येथील भूकंपग्रस्त आपल्या न्याय हक्कासाठी १९९५-९६ पासून सनदशीर मार्गाने मागणी करीत आहेत. शासनाकडून लेखी आश्वासने मिळाले आहेत. परंतु अद्याप कबाले देण्यात आले नाहीत. सतत पुराव्यासह अर्ज मागणी करूनही या भूकंपग्रस्तवर अन्याय झाला आहे. कबाले नसल्यामुळे घरामध्ये लाईट नाही. पंचवीस तीस वर्षांपासून हे नागरिक अंधारात राहतात. त्यांच्या मुलांचे शिक्षण होत नाही आणि शिकलेल्या मुलांना भूकंपग्रस्त प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले नाही. इतरांची ग्रामपंचायतमध्ये नोंद आहे. परंतु या आंदोलनकर्त्यांच्या घराची नोंद नाही. मागील तीन वर्षांपासून पुराव्यासह वेळोवेळी उपोषणे केली.अर्ज दिले. परंतु त्यांच्या मागण्यांकडे प्रशासनाकडून दुर्लक्षित होत आहे. त्यामुळे गेल्या चौदा दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. काही आंदोलनकर्त्यांची प्रकृती बिघडली आहे.तरीही जिल्हा प्रशासन अद्याप काही निर्णयापर्यंत आलेले नाही. या आंदोलनाला सामाजिक कार्यकर्ते रामकुमार रायवाडीकर यांनी पाठिंबा दिला असून जोपर्यंत न्याय दिला जात नाही, तोपर्यंत अन्न घेतले जाणार नाही, असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला आहे. दरम्यान, आंदोलकांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना दोन वेळा रुग्णालयात हलविले.पण पुन्हा रुग्णालयातून येऊन त्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू ठेवले आहे. यात काही वयस्क शुगर,बीपीचे रुग्ण आहेत. त्यांची प्रकृती गंभीर बनत चालली आहे. याचा विचार करून आंदोलनकर्त्यांच्या न्याय मागणीचा विचार करावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. नवनाथ गायकवाड, जालिंदर गायकवाड, संतोष कांबळे, शंकर गायकवाड, शिवदर्शन गायकवाड यांचा अन्नत्याग आंदोलनात सहभाग आहे. या आंदोलनाला रामकुमार रायवाडीकर, सूरज पाटील, ऑ. डी. एन. भालेराव, संजय व्यवहारे, बाबूराव झाकडे, रमेश कांबळे, शाम वरयाणी, माधवराव गायकवाड, अंगदराव कांबळे, वलीभाई शेख, प्रा. दिनकर कांबळे, दिगंबर सूर्यवंशी, भाऊसाहेब तेलंगे आदींनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.