बाजारात हरभऱ्याचे दर घसरल्याने शेतकऱ्यांचा हमीभाव केंद्राकडे कल !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:14 IST2021-06-10T04:14:43+5:302021-06-10T04:14:43+5:30
वलांडी : यंदाच्या रबी हंगामात हरभऱ्याचे उत्पादन वाढण्याबरोबरच दरही आधारभूत किमतीपेक्षा अधिक असल्याने शेतकरी बाजार समितीत हरभरा विक्रीस प्राधान्य ...

बाजारात हरभऱ्याचे दर घसरल्याने शेतकऱ्यांचा हमीभाव केंद्राकडे कल !
वलांडी : यंदाच्या रबी हंगामात हरभऱ्याचे उत्पादन वाढण्याबरोबरच दरही आधारभूत किमतीपेक्षा अधिक असल्याने शेतकरी बाजार समितीत हरभरा विक्रीस प्राधान्य देत होते. आता बाजारपेठेतील भावात घसरण झाल्याने शेतकरी पुन्हा हमीभाव खरेदी केंद्रावर हरभरा विक्रीसाठी वळले आहेत. परिणामी, देवणी तालुक्यातील वलांडी येथील हमीभाव खरेदी केंद्रावर नोंदणी केलेल्या ९०० पैकी ४०६ शेतकऱ्यांनी ५ हजार ७१५ क्विंटल हरभऱ्याची विक्री केली आहे.
वलांडी येथे ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या वतीने हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. दोन जानेवारीपासून सदर केंद्रावर हरभरा खरेदी नोंदणी प्रारंभ झाला. केंद्रावर वलांडीसह परिसरातील ९०० शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीसाठी नोंदणी केली. आतापर्यंत या केंद्रावर ९०० पैकी ४०६ शेतकऱ्यांनी ५ हजार ७१६ क्विंटल हरभऱ्याची विक्री केली असल्याचे संचालक बिभीषण भोसले यांनी सांगितले. गेल्या पावसाळ्यात अधिक पाऊस पडल्याने जलसाठे तुडुंब भरले होते. त्याचा लाभ रबी हंगामासाठी झाला. त्यामुळे या परिसरातील रबीचा पेरा जास्त झाला होता. पिकांना पुरेसे पाणी मिळाल्याने उत्पादनही चांगले झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी हरभऱ्याची काढणी केल्यानंतर विक्री करण्यास सुरुवात केली. कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरुवातीपासूनच हरभऱ्याला चांगला दर मिळत होता. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळाला. केंद्र शासनाने हरभऱ्याला ५ हजार १०० रुपये प्रतिक्विंटल अशी आधारभूत किंमत जाहीर केली होती. त्यामुळे वलांडीसह परिसरातील ९०० शेतकऱ्यांनी येथील हमीभाव केंद्रावर हरभरा विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी केली. त्यानुसार नाफेडच्या वतीने शेतकऱ्यांची अडचण होऊ नये म्हणून २४ फेब्रुवारीपासून हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले; परंतु बाजार समितीत हमीभावापेक्षा अधिक दर मिळत असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी हमीभाव खरेदी केंद्राकडे पाठ फिरवीत बाजार समितीत हरभऱ्याची विक्री केली. दरम्यान, काही दिवसांपासून बाजार समितीतील हरभऱ्याच्या दरात घसरण झाली आहे, बुधवारी हरभऱ्याला ४५०० ते ४६०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला आहे. त्यामुळे हमीभावाच्या तुलनेत शेतकऱ्यांना किमान ५०० रुपयांपेक्षा अधिकचा फटका क्विंटलमागे बसत असल्याचे चित्र आहे.
नोंदणीस मुदतवाढीमुळे शेतकऱ्यांना दिलासा...
हमीभाव केंद्रावर हरभरा विक्री व नोंदणीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. आता शासनाने नोंदणीचा व खरेदीचा कालावधी वाढविल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. बाजारापेक्षा हमीभाव केंद्रावर अधिकचा दर मिळत असल्याने शेतकरी हमीभाव केंद्राकडे वळले असल्याचे भाजपचे माजी तालुकाध्यक्ष चंद्रशेखर महाजन यांनी सांगितले.
आतापर्यंत १ कोटी ५६ लाख वर्ग...
यंदाच्या रबी हंगामात वलांडी येथील देवणी ॲग्रो प्रोड्युसर कंपनीच्या हमीभाव खरेदी केंद्रावर ४०६ शेतकऱ्यांचा ५ हजार ७१५ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे. त्यापोटी संबंधित शेतकऱ्याच्या खात्यावर १ कोटी ५६ लाख रुपये वर्ग करण्यात आले आहेत. उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच रक्कम वर्ग करण्यात येणार आहे. हरभरा खरेदी नोंदणीस १८ जूनपर्यंत मुदतवाढ मिळाली असून, २५ जूनपर्यंत हरभऱ्याची खरेदी करण्यात येणार असल्याचे संचालक बिभीषण भोसले यांनी सांगितले.