शेतकऱ्यांनी बीजोत्पादन करूनच बियाणे वापरावीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:22 IST2021-09-21T04:22:04+5:302021-09-21T04:22:04+5:30
लातूर येथील संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालयात (कॉक्सिट) शेतकऱ्यांसाठी ‘सोयाबीन, तूर व हरभरा पिकांचे बीजोत्पादन व काढणीनंतरचे व्यवस्थापन’ या ...

शेतकऱ्यांनी बीजोत्पादन करूनच बियाणे वापरावीत
लातूर येथील संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालयात (कॉक्सिट) शेतकऱ्यांसाठी ‘सोयाबीन, तूर व हरभरा पिकांचे बीजोत्पादन व काढणीनंतरचे व्यवस्थापन’ या विषयावर कार्यशाळा झाली. अध्यक्षस्थानी रॉयल एज्युकेशन सोसायटीचे प्रमुख डॉ. एम. आय. पाटील होते. यावेळी प्राचार्य डॉ. एन. एस. झुल्पे, प्रा. कैलास जाधव, जैव तंत्रज्ञान विभागप्रमुख प्रा. ईश्वर पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी डिग्रसे म्हणाले, लातूर जिल्ह्यात सोयाबीनचे क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. यावर्षी जवळपास ८० टक्के क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला. कमी खर्चात सोयाबीनचे उत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वत:च बीजोत्पादन करण्यासोबतच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे. पेरणीपासून काढणी व नंतर बियाणांची हाताळणी योग्य पद्धतीने करावी. त्यावर प्रक्रिया करून ठेवल्यास बियाणे सुरक्षित राहतील.
प्रा. एम. आर. पाटील म्हणाले, शेतकऱ्यांनी कमी खर्चात जास्त उत्पादन देणारी आधुनिक शेती करण्याची गरज आहे. आपणच उत्पादित केलेले बियाणे पेरणीवेळी शेतकऱ्यांना भरमसाठ किंमत मोजून विकत घ्यावी लागते. हे टाळण्यासाठी बीजोत्पादक व्हावे. शेतीवर आधारित असलेले इतर उद्योग व अवलंबित सर्व घटक जोमाने सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. प्राचार्य झुल्पे यांनी कार्यशाळेची भूमिका विशद केली. प्रास्ताविक प्रा. ईश्वर पाटील यांनी केले. प्रा. शरद गंगावणे यांनी आभार मानले.
फोटो कॅप्शन :
कॉक्सिट महाविद्यालयात सोयाबीन कार्यशाळेत बोलताना कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. एस. एस. डिग्रसे. मंचावर संस्थाध्यक्ष प्रा. एम. आर. पाटील, प्राचार्य डॉ. एन. एस. झुल्पे.