तोडणीचा खर्चही पदरी पडत नसल्याने शेतकऱ्यांनी सोडले शेतातच टोमॅटो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:24 IST2021-09-12T04:24:30+5:302021-09-12T04:24:30+5:30
औराद शहाजानी : लाखो रुपये खर्चून औराद शहाजानी परिसरातील शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली; परंतु सततच्या पावसामुळे टोमॅटोस फटका बसला ...

तोडणीचा खर्चही पदरी पडत नसल्याने शेतकऱ्यांनी सोडले शेतातच टोमॅटो
औराद शहाजानी : लाखो रुपये खर्चून औराद शहाजानी परिसरातील शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली; परंतु सततच्या पावसामुळे टोमॅटोस फटका बसला आहे. त्यातच बाजारपेठेत दर कोसळल्याने तोडणीचा खर्चही पदरी पडेनासा झाला आहे. परिणामी, बहुतांश शेतकऱ्यांनी तोडणी न केल्याने टाेमॅटो शेतातील रोपांनाच सडून जात आहेत.
निलंगा तालुक्यातील औराद शहाजानीसह जिल्ह्यातील वडवळ, किल्लारी, हेर, जानवळ, औसा, लातूरराेड आदी भागात टोमॅटोचे उत्पादन घेतले जाते. जवळपास ५० गावांतील शेकडाे एकर जमिनीवर पावसाळी टोमॅटोचे पीक घेतले जाते. येथील टोमॅटोस राज्यातील प्रमुख बाजारपेठांसह परराज्यातही मागणी असते. व्यापारी या भागात येऊन स्वत: खरेदी करतात. त्यामुळे नगदी पीक म्हणून टोमॅटोस ओळखले जाते.
टोमॅटोसाठी एकरी ७० ते १ लाखापर्यंत खर्च येताे. यंदा लागवड क्षेत्र वाढले असले तरी सततच्या मुसळधार पावसामुळे फळधारणा कमी झाली. अतिपावसामुळे टोमॅटो चिरला गेला. अशा परिस्थितीत बाजारपेठेत मागणी नसल्याने दर घसरले आहेत. सध्या किरकोळ बाजारात २ ते ४ रुपये प्रति किलो असा भाव मिळत आहे. त्यातून लागवडीचाच नव्हे तर तोडणीचाही खर्च निघेनासा झाला आहे. त्यातच इंधनाचे दर वाढल्याने वाहतूक खर्च वाढला आहे.
परिणामी, या भागातील बहुतांश शेतकऱ्यांनी तोडणीस आलेल्या टोमॅटोची तोडणीही केली नाही. त्यामुळे शेतातच ते सडत आहेत. दरम्यान, गावरान टोमॅटो आंबट जास्त असल्याने जनावरांनाही टाकता येत नाही.
टोमॅटोसाठी खर्च वाढला...
लागवडीसाठी राेपे, खत, औषध लागतात. त्याचा खर्च वाढला आहे. याशिवाय, मजूर, मल्चिंग पेपर, तार, काठी, सुतळीचा खर्च लाखाच्या घरात जातो. सध्या भाव कोसळल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे सरकारने पंचनामा करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी टोमॅटो उत्पादक करीत आहेत.
एक जिल्हा, एक उत्पादनात समावेश...
शासनाच्या एक जिल्हा, एक पीक याेजनेत लातूर जिल्ह्यासाठी टोमॅटोची निवड करण्यात आली आहे. यात पीएमएसएमई या याेजनेचा जिल्ह्यातील टोमॅटो उत्पादकांनी लाभ घ्यावा. गट व कंपनीच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योग उभारावेत. त्यासाठी ३५ टक्के अनुदान देण्यात येते.
- राजेंद्र कदम, उपविभागीय कृषी अधिकारी, लातूर.
लागवड जास्त झाल्याने घसरण...
यंदा लागवड जास्त झाली असून, मागणीपेक्षा आवक वाढली आहे. त्यामुळे दर कोसळले आहेत. सततच्या पावसामुळे टोमॅटो चिरला गेला आहे. त्यातच फळमाशीचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे दूरच्या बाजारपेठेत हा शेतमाल पाठविता येत नाही, असे खरेदीदार व्यापारी वहाब पटेल म्हणाले.
भाजीपाल्याला भाव नाहीत...
सावरी येथील शेतकरी विठ्ठल अंचुळे म्हणाले की, मी दरवर्षी टोमॅटोची लागवड करतो, तसेच इतर भाजीपाल्याचीही लागवड केली आहे. गत महिन्यापासून कुठल्याही भाजीपाल्याला भाव नाहीत. त्यामुळे उत्पादन आणि खर्चाचा ताळमेळ लागत नाही. शासनाने हमीभाव द्यावा. त्यामुळे ग्राहकांनाही योग्य भावात भाजीपाला मिळेल आणि शेतकऱ्यांनाही उत्पादन खर्च मिळेल.
पावसाचा परिणाम झाला...
औराद येथील शेतकरी सुधाकर म्हेत्रे म्हणाले की, यंदा टोमॅटो लागवडीनंतर सतत महिनाभर जोरदार पाऊस झाला. त्यामुळे पिकाची वाढ झाली नाही. जे फळ लागले, ते नंतर अतिपावसाने चिरून सडून गेले. उर्वरित टोमॅटोला बाजारात मागणी नाही.