वीजबिल वसुलीविरोधात शेतकरी संघटना आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:19 IST2021-04-04T04:19:47+5:302021-04-04T04:19:47+5:30
लातूर : महावितरणकडून सक्तीने वीजबिल वसुली आणि वीज तोडली जात असल्याच्या निषेधार्थ शेतकरी संघटनेकडून औसा तालुक्यातील हिप्परसोगा येथे महावितरण ...

वीजबिल वसुलीविरोधात शेतकरी संघटना आक्रमक
लातूर : महावितरणकडून सक्तीने वीजबिल वसुली आणि वीज तोडली जात असल्याच्या निषेधार्थ शेतकरी संघटनेकडून औसा तालुक्यातील हिप्परसोगा येथे महावितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंत्याला स्थानबद्ध करण्यात आले. शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवला नाही तर दुसऱ्या टप्प्यात प्रत्येक तालुक्यात आंदोलन करण्याचा इशाराही शेतकरी संघटनेकडून देण्यात आला. मागील वर्षभरापासून कोरोनामुळे सामान्य नागरिक व शेतकरी त्रस्त आहेत. त्यातच महावितरण कंपनीकडून सक्तीने वीजबिल वसुली केली जात आहे. घरगुती आणि शेतीपंपांचे वीज कनेक्शन तोडले जात आहे. यामुळे पाणी असूनही ते शेतीला देता येत नाही. महावितरण कंपनीच्या या मनमानीविरोधात शेतकरी संघटनेकडून वीजबिल वसुलीसाठी गावात येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्थानबद्ध करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार हिप्परसोगा येथे आलेल्या लोदगा शाखेच्या कनिष्ठ अभियंत्यांना शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्थानबद्ध केले. यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाप्रमुख मदन सोमवंशी, माधवराव मल्लेशे, बालाजी जाधव, बालाजी सोमवंशी, मंगलबाई सोमवंशी, युवा जिल्हाध्यक्ष रुपेश शंके उपस्थित होते. महावितरण कंपनीने वीजबिल वसुली मोहीम तत्काळ थांबवावी अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.